MSRTC : लालपरी अब दुर्गम आदिवासी पाड्यांपर्यंत, प्रवाशांना मिळणार सुव्यवस्थित सेवा

MSRTC : लालपरी अब दुर्गम आदिवासी पाड्यांपर्यंत, प्रवाशांना मिळणार सुव्यवस्थित सेवा

महाराष्ट्रातील दुर्गम खेडे आणि आदिवासी पाड्यांपर्यंत एसटी बस सेवा पोहोचवण्याचे स्वप्न आता सत्यात उतरू लागले आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

महाराष्ट्रातील दुर्गम खेडे आणि आदिवासी पाड्यांपर्यंत एसटी बस सेवा पोहोचवण्याचे स्वप्न आता सत्यात उतरू लागले आहे. राज्य परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी म्हटले की, “आता केवळ गावात एसटी नसेल तर आदिवासी पाड्यातही एसटी सेवा पोहोचणार आहे.” हा निर्णय महाराष्ट्रातील दुर्गम भागांतील विकासाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे.

लालपरीच्या चाकांमध्ये फक्त प्रवास नाही, तर परिवर्तनाची गती

प्रताप सरनाईक म्हणाले, "दुर्गम भागातील आदिवासी समाज आता एसटीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राशी जोडला जाईल. लालपरीच्या चाकांमध्ये फक्त प्रवास नाही, तर सामाजिक परिवर्तनाची गती दडली आहे. डोंगर-दऱ्यांतील शांत पाड्यांवर लवकरच एसटीचा हॉर्न घुमेल."

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ मिडी बसेस – आदिवासी पाड्यांसाठी खास

राज्य परिवहन महामंडळ १०० अत्याधुनिक मिडी बसेस खरेदी करत आहे. ही ९ मीटर लांबी आणि ३५ आसन व्यवस्था असलेली बसेस अरुंद रस्ते, तीव्र चढ-उतार आणि वळणावळणाच्या घाट रस्त्यांवरून सहज धावू शकतील. या बसेस खास आदिवासी पाड्यांसाठी खरेदी केल्या आहेत आणि त्यांना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ असे नाव देण्यात आले आहे.

या मिडी बसेस शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या गरजांमध्ये आदिवासी समाजासाठी सेतू ठरतील. शहरात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, आरोग्यसेवेकरिता धाव घेणाऱ्या मातांसाठी आणि रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही बसेस आशेचा किरण ठरणार आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा थकीत वेतन लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. राज्य सरकारने १०० कोटींचा निधी मंजूर केला असून, यामुळे ८६ हजार कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन हप्ते जमा केले जातील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला असून, वेतनवाढ समान टप्प्यात विभागणी करून खर्चाची हमी सरकारने दिली आहे.

स्वातंत्र्यानंतरच्या आठ दशकांतील प्रगती

स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रातील ९३% लोकसंख्या एसटी सेवेशी जोडली गेली आहे, तरीही सह्याद्री व मेळघाटच्या दऱ्याखोऱ्यातील पाडे विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. या नवीन योजना आणि मिडी बसेस या पाड्यांपर्यंत सेवा पोहोचवून सामाजिक समावेश, विकास आणि रोजगाराच्या संधी सुनिश्चित करतील. राज्य परिवहन महामंडळाची ही पुढाकार योजना प्रवाशांसाठी सुविधा वाढवण्याबरोबरच सामाजिक समावेशाचा संदेश देखील देते. लवकरच आदिवासी पाड्यांमध्ये लालपरीच्या हॉर्नच्या आवाजात नवीन विकासाचा सूर ऐकू येईल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com