Weather Alert : अतिमुसळधार पावसाचा थेट अलर्ट; महाराष्ट्रासह देशात हवामानाचा गोंधळ

Weather Alert : अतिमुसळधार पावसाचा थेट अलर्ट; महाराष्ट्रासह देशात हवामानाचा गोंधळ

राज्यासह संपूर्ण देशात हवामानाने अचानक कलाटणी घेतली असून फेब्रुवारी महिन्यातच पावसाचे आणि उकाड्याचे मिश्र स्वरूप पाहायला मिळत आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

राज्यासह संपूर्ण देशात हवामानाने अचानक कलाटणी घेतली असून फेब्रुवारी महिन्यातच पावसाचे आणि उकाड्याचे मिश्र स्वरूप पाहायला मिळत आहे. साधारणपणे थंडीचा कडाका असणाऱ्या या काळात राज्यातून थंडी जवळपास गायब झाली असून अनेक भागांत ढगाळ वातावरण, उष्णता आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील तापमानात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली असून येथे किमान तापमान 10.4 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. मात्र, सकाळी गारवा जाणवत असला तरी दुपारच्या वेळेत उन्हाचा चटका वाढत असून उकाडा जाणवण्याची शक्यता आहे. हवामान विभागानुसार, पुढील 48 तासांत किमान तापमानात 2 ते 3 अंशांची घट होण्याची शक्यता आहे, त्यामुळे काही भागांत पुन्हा थंडीचा जोर वाढू शकतो.

मुंबईत हवामानासोबतच हवेच्या गुणवत्तेचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे. मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) पुन्हा एकदा ‘वाईट’ श्रेणीत पोहोचला असून तो 204 वर गेला आहे. पीएम 10 चे प्रमाण 180 तर पीएम 2.5 चे प्रमाण 151 इतके नोंदवले गेले आहे. यामुळे शहरात धुरकट वातावरण निर्माण झाले असून दृष्यमानतेवर त्याचा परिणाम होताना दिसत आहे. सकाळच्या वेळेत धुके आणि धुरकट वातावरण, तर दुपारच्या वेळेत आकाश निरभ्र राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसच्या आसपास राहणार असल्याने उन्हाचा तडाखा जाणवणार आहे.

देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये मात्र कडाक्याची थंडी कायम आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तर राजस्थान, छत्तीसगड आणि बिहारमध्ये किमान तापमान 5 ते 10 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. काही भागांत मुसळधार पावसाचाही इशारा देण्यात आला असून त्यामुळे नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

हवामानातील सततच्या बदलांचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. सर्दी, ताप, अंगदुखी, डोकेदुखी यांसारख्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याचे डॉक्टर सांगतात. त्यामुळे बदलत्या हवामानात नागरिकांनी काळजी घेणे, पुरेसे पाणी पिणे आणि आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. एकीकडे मुसळधार पाऊस, दुसरीकडे कडाक्याची थंडी आणि काही भागांत तीव्र उकाडा असा विचित्र हवामान अनुभव देशवासीयांना येत असून पुढील काही दिवस हवामान अस्थिरच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com