पोलीस कारवाईला मिळणार गती; वसई विरार पोलिसांच्या ताफ्यात 13 चारचाकी
संदीप गायकवाड | वसई-विरारमधील गुन्हेगारीवर वचक बसवण्यास पोलिसांना आणखीन गती मिळणार आहे. कारण जिल्हा प्रशासनाकडून 13 चारचाकी वाहने वसई विरार पोलिसांना हस्तांतरित करण्यात आली. त्यामुळे पोलीसांच्या कारवाईला गती मिळणार असून गुन्हेगारीवर वचक बसणार आहे.
पालघर जिल्हा प्रशासनाकडून वसई विरार मधील पोलीस ठाण्यांना 13 चारचाकी वाहने हस्तांतरित करण्यात आली आहेत. कृषिमंत्री तथा पालघर चे पालकमंत्री दादा भुसे, मिरा – भाईंदर , वसई – विरार पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या उपस्थितीत या वाहनाचा हस्तातरं सोहळा पार पडला आहे.
आयुक्तालया अंतर्गत सध्या पोलीस ठाण्याची संख्या वाढत आहे. त्यानुसार पोलिसांना गाड्यांची कमतरता भासत असल्याने, त्याबाबत पालघर जिल्हा प्रशासनाकडे मागणी करण्यात आली होती. जिल्हा नियोजन समीतीतर्फे गाड्यांचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर आज सर्वांच्या सर्व 13 गाड्या पोलीसाना देण्यात आल्या आहेत.
वसई विरार मधील परिमंडळ 2 आणि 3 मधील पोलीस ठाण्यांना वापरण्यासाठी देण्यात आल्या आहेत. वसई विरार शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच पोलिसांना तात्काळ घटनास्थळी पोहोचण्यासाठी या गाड्या अत्यंत उपयोगी ठरणार असल्याचे मत पालकमंत्री आणि पोलीस आयुक्तांनी यावेळी सांगितले.