तेलंगणा-महाराष्ट्र सीमावर्ती भागात भूकंपाचे धक्के; 3.1 होती तीव्रता
अनिल ठाकरे | चंद्रपूर : तेलंगणा-महाराष्ट्र सीमावर्ती भागात आज भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 3.1 होती. भूकंपाचे केंद्र तेलंगणा राज्यातील कागदनगर जवळील दहेगाव होते. या भूकंपाची नोंद नागपूर येथील भूकंप मापक केंद्रात झाली आहे. यात जीवित वा कुठलीही वित्तहानी झाल्याची माहिती अद्याप नाही. मात्र, या भूकंपामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. भूकंप झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडे अद्याप आलेली नाही, अशी माहिती आहे.
दिगोजोली येथील नवजीवन माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यानी भूकंपाचे धक्के अनुभवले. लगेच विद्यार्थी वर्गाबाहेर आले. मात्र, या परिसरात विहिरीचे बांधकाम सुरु आहे. अधून मधून विहिरीसाठी ब्लास्टिंग केले जाते. त्यामुळे हे हे धक्के जाणवले असावे, असं शिक्षकांना वाटले होते.
तेलंगणा राज्यात कागजनगर तालुक्यातील दहेगाव जवळ ३.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. हा भूकंप जमिनीत ५ कि.मी. च्या आत झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यालगत असलेल्या तेलंगणा राज्य हे भूकंप प्रवण क्षेत्र असून इथे दरवर्षी २ ते ४ रिश्टर स्केलचे भूकंप होत असतात. लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यात हे धक्के जाणवतात. गोदावरी क्षेत्र हे भूकंप धोका दोन आणि तीन प्रकारात मोडते. त्यामुळे इथे अधून-मधून भूकंप होत असतात, असे अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.
चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले. सोबतच गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात येणाऱ्या महागाव येथेही भूकंपाचे धक्के जाणवले, अशी माहिती अभ्यासकांनी दिली. दरम्यान, गोंडपिपरी तालुक्यातील दरूर नंदवर्धन परिसरात दहा पंधरा वर्षांपूर्वी भूकंपाचे धक्के जाणवले होते. या धक्क्यांनी गावकरी घाबरलेत. काहींनी घर सोडून खुल्या जागेत संसार मांडला होता. आज झालेल्या धक्क्यांनी पुन्हा त्या घटनेची आठवण करून दिली आहे.