दहा वर्षापासून परदेशात अडकलेली तरुणी पुन्हा भारतात; पोलिसांची कारवाई
रिध्देश हातीम | मुंबई : भारतातून परदेशात काम करण्यासाठी अनेक तरुण-तरुणी जात असतात यात काहींची फसवणूक होते. भारतातून जाताना त्यांना चांगली नोकरी देऊ यातून तुम्हाला चांगले पैसे मिळतील, असे आमिष दाखवतात. मात्र, तिकडे जाऊन त्यांना मोलमजुरी करण्यास भाग पडतात. असाच काही एका गोवाच्या तरुणी बरोबर घडलं. तिला कामाचा आमिष दाखवून बहरीन या देशात नेलं. मात्र, तिकडे जाऊन तिला घरकाम करण्यास भाग पाडलं
मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यातील तिसवाडी येथील तेजल रामा गवस (वय २३) ही तरुणी परदेशात एजंटमार्फत १७ फेब्रुवारी २०१३ रोजी बहरिनला नोकरी करण्यासाठी गेली होती. मात्र, नोकरीच्या नावाखाली तिला घरकाम करण्यास भाग पाडण्यात आले होते. काम करण्यास नकार दिल्याने तिच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला व तिचा मोबाइलही जप्त केला गेला. त्यामुळे ती कोणालाही संपर्क साधू शकली नाही.
या प्रकरणामुळे घाबरलेल्या तरुणीच्या कुटुंबियांनी अन्य नातेवाईकांशी अथक प्रयत्न करून संपर्क साधला. तिचे नातेवाईक विष्णू राऊळ यांनी याप्रकरणी १४ मार्च रोजी मुंबई पोलिसांकडे तक्रार दिली. राऊळ यांनी तेजलला भारतात परत आणण्याची पोलिसांकडे विनंती केली. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष १० च्या पोलिसांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.
गुन्हे शाखेच्या कक्ष १० चे प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज चौधरी यांनी तात्काळ परदेशी पाठवणारे एजंट व बहरीन येथील भारतीय वकिलातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तेजलला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. तसेच बहरिन येथील स्थायिक भारतीय नागरिक 'गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम'चे अध्यक्ष डॉ. सुनील मांजरेकर, जयवंत पालेकर यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांच्या मदतीने बहरिन येथील भारतीय वकिलातीची मदत घेण्यात आली. भारतीय वकिलातीनेही याप्रकरणी सर्वोतोपरी मदत करून बहरिन येथून तेजलला सुखरूप भारतात पाठवण्याची व्यवस्था केली.