पुण्यात 200 लोकांना 300 कोटींचा गंडा; हा स्कॅम आहे तरी काय?
अमोल धर्माधिकारी | पुणे : आत्तापर्यंत तुम्ही आर्थिक फसवणुकीचे विविध रूप बघितले असतील. सोशल मीडियावर केलेला आणि टाईम असेल किंवा बोगस कागदपत्रे बनवून केलेली पैशांची अफरातफर असेल. मात्र, पुण्यातून समोर आलेल्या एक घोटाळा तुम्हाला थक्क करून टाकेल. याचे कारण असे की पुण्यात दोनशेहून अधिक लोकांना एका व्यक्तीने 300 कोटी रुपयांना गंडा घातला आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनमध्ये कर्जबाजारी झालेल्या नागरिकांचे कर्ज फेडून टाकतो असे आमिष दाखवत चेन्नईच्या एका महाशयाने पुण्यातील 200हून अधिक लोकांना 300 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
फसवणुकीचा सगळा प्रकार गेल्या 2 वर्षांपासून सुरू होता. यातील मुख्य आरोपी सेल्वाकुमार नडार हा मूळचा चेन्नईचा. पण, गेल्या अनेक वर्षांपासून बायको आणि मुलासह पुण्यातील कोंढवा भागात राहायला होता. नडारने पुणे पोलिस आयुक्तालयासमोर असलेल्या एका मॉलमध्ये एक ऑफिस भाड्याने घेतले होते आणि त्या ठिकाणी अष्टविनायक इन्व्हेस्टमेंट या नावाने एक संस्था चालू केली.
कोरोना लॉकडाऊनमुळे अनेक जणांना कर्ज फेडण्यासाठी पैसे नव्हते किंवा ज्यांना कर्ज परत करायचे आहे. अशा लोकांना नडार व साथीदारांनी गुंतवणुकीवर परतावा देण्याचे तसेच तुमचे सगळे कर्ज फेडू, असे आमिष दाखविले. गुंतवणूकादारांकडून पैसे घेऊन ते शेअर बाजार, कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करायचे. गुंतवणूक करण्यात आलेल्या रक्कमेतून मिळालेल्या नफ्यातील काही हिस्सा गुंतवणूकादारांना दिला जायचा. तसेच, एखाद्याला कर्ज उपलब्ध करुन दिल्यास काही हप्ते फेडले जायचे.
नडारने एकाच व्यक्तीच्या नावाखाली कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 9 बँकांकडून कर्ज घेतले. अनेक महिने नडारने गुंतवणूकदारांचे कर्जाचे हफ्ते फेडले सुद्धा. पण, जानेवारी पासून हफ्ते गेले नसल्यामुळे नागरिकांना या संस्थेचा संशय आला आणि त्यासाठी काही जण एकत्र आले आणि त्यांनी पुण्यात कार्यालयावर जायचे ठरवले. कार्यालयवर जाताच त्यांना तेथे कुलूप दिसले आणि नडारचा फोन सुद्धा बंद झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच काही जणांनी एकत्र येत पोलिसात धाव घेतली.
कोरोना लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक जणांना नोकरी गमवावी लागली होती. अशाच आयटी मधील काम करणाऱ्या लोकांना नडारने त्याच्या रडारवर ठेवले. कसा रचला. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आत्तापर्यंत 200 हून अधिक जणांची अशीच फसवणूक केली आहे आणि याचा आकडा देखील 300 कोटी रुपयांचा घरात आहे. त्यामुळे तुम्ही जर गुंतवणूक करत असाल तर एकदा ती संस्था खरी आहे का? हे तपासा नाहीतर तुम्ही देखील या स्कॅम मध्ये अडकलात म्हणून समजा.