राज्यात पुढचे तीन दिवस अतिमुसळधार; हवामान खात्यानं दिला 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
मुंबई : राज्यात विश्रातीनंतर पावसाने जोरदार कमबॅक केले असून सर्वत्रच कोसळधार सुरु आहे. अनेक ठिकाणी पावसाने थैमान घालायला सुरुवात केली आहे. राज्यात पुढचे तीन दिवस अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. अनेक जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. दरम्यान, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र पुढील 24 तासात तीव्र होत डिप्रेशनमध्ये रुपांतरीत होणार आहे. यामुळे पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. यामुळे ९ ते 11 ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून वादळीवारा तसेच वीज पडण्याची शक्यता आहे. विदर्भात उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, नागपूर या शहरांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.
कोकणातील पालघर, ठाणे, रत्नागिरी, मुंबई, सिंधुदुर्ग, रायगड तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा आणि विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी आवश्य कामे असल्यास घराबाहेर पडावे. असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे पुरस्थितीजन्य स्थिती उत्पन्न होऊ शकते. हे लक्षात घेता प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. मागील दिवसांमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. तर नदी, नालेही तुडुंब भरुन वाहत आहे. परंतु, मुसळधार पावसामुळे पिके वाहून गेली असून शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.