वादळी वारा, गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान; कृषीमंत्र्यांनी दिले पंचनाम्याचे आदेश
अनिल साबळे | छत्रपती संभाजीनगर : राज्यात आज काही ठिकाणी वादळी वारा, गारपिटीसोबत पावसाच्या सरी बरसल्या आहेत. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहे. तसेच, नुकसानी भरपाई संदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील, असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने जिल्ह्यात काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला जात होता. मध्यरात्रीपासून ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे कांदा, गहू, हरभरा, आंबा, द्राक्षं यांसह भाजीपाल्याला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. एकीकडे शेतमालाला भाव नसताना दुसरीकडे अवकाळी पावसाच्या हजेरीने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले असून नुकसानी भरपाई संदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील, असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे.