अधिकाराचा गैरवापर किती दिवस सहन करणार – शरद पवार
रूपेश होले, बारामती | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांसह, साखर कारखान्यांवर आज आयकर विभागाने छापे टाकले. या छापेमारीवर बोलताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उत्तरप्रदेशच्या घटनेची तुलना मी जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली. त्याचा संताप किंवा राग सत्ताधाऱ्यांना आला असावा, आजची कारवाई ही त्यावरील प्रतिक्रिया असावी, असे विधान करत त्यांनी केंद्र सरकारवर निशाना साधला.बारामती येथील गोविंदबाग निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते.
पवार म्हणाले, एखाद्या विषयासंबंधी शंका आल्यास त्याची चौकशी करण्याचा अधिकार यंत्रणांना आहे. परंतु अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घरी छापे टाकणे हा अधिकाराचा अतिरेक आहे. अधिकाराचा असा गैरवापर किती दिवस सहन करायचा याचा आता लोकांनीच विचार करावा,असे पवार म्हणाले.
दरम्यान, महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद मिळेल स्थानिक स्वराज्य संस्थांसह काही पोटनिवडणूकांमध्ये महाविकास आघाडी स्वतंत्रपणे लढूनही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तिन्ही पक्ष एकत्रित लढले तर शंभर टक्के निकाल त्यांच्या बाजूने जाईल असाहि अंदाज पवार यांनी व्यक्त केला.
किरीट सोमय्या यांना टोला
"काही लोक भाषणे करून अथवा पत्रकार परिषदा घेवून आरोप करतात. ते बोलल्यानंतर केंद्रीय एजन्सीज कारवाई करण्यासाठी पुढे येतात ही आक्षेपार्ह बाब असल्याचा टोला ज्येष्ठ नेते पवार यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना लगावला."