लव्ह जिहाद प्रकरणी दिरंगाई करणारे पोलीस अधिकारी अनिल बोंडेंच्या रडारवर
सुरज दाहाट|अमरावती : जिल्ह्यातील धारणी येथील लव्ह जिहाद प्रकरणात महेश देशमुख यांच्या चंद्रविला चॅरिटेबल ट्रस्टवर गुन्हे दाखल झाल्यानंतर या प्रकरणात दिरंगाई करणारे चार पोलीस अधिकारी खासदार अनिल बोंडे यांच्या रडारवर आले आहेत. या संदर्भात कारवाईसाठी ते गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देणार आहेत.
अमरावती जिल्ह्यात लव्ह जिहादचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याने हिंदू मुलींचे आयुष्य बरबाद होण्याच्या मार्गावर आहे. असा आरोप खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे.अलीकडेच धारणी येथे घडलेल्या लव्ह जिहादच्या घटनेप्रकरणी धारणी येथील ठाणेदार बेलखेडे, उपविभागीय पोलीस अधिकारी गोहर, पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ तर शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांनी यामध्ये दिरंगाई करत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. मात्र खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी या प्रकरणी आक्रमक होत घटनेतील पीडित कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी पुढाकार घेतला.
यासंदर्भात त्यांनी पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंह यांच्याशी बोलून चंद्रविला संस्थेला आंतरधर्मीय विवाह लावण्याची अनुमती नसताना हिंदू मुलीचे व मुस्लिम मुलाचे लग्न लावून घेण्यात आले. संस्थेकडून देण्यात आलेल्या प्रमाणपत्रावर काजीची सही नाही. मेहरची रक्कम नाही. मुस्लिम कायद्याप्रमाने ते असायला पाहिजे. पण मुळात हा संपूर्ण प्रकारच अवैध असल्याचे त्यांनी पोलीस आयुक्तांना सांगितले होते. त्यानुसार स्थानिक फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात चंद्रविला संस्थेविरुद्ध शनिवारी (ता.३) फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. असे असले तरी या प्रकरणात ग्रामीण पोलिसांकडून अक्षम्य दिरंगाई करण्यात आली. त्यामुळे धारणीचे ठाणेदार बेलखेडे, उपविभागीय अधिकारी गोहर, पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, गुन्हे शाखेचे ठाणेदार अर्जुन ठोसरे यांच्याविरुद्ध कारवाईसाठी खा.डॉ.अनिल बोंडे हे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देणार आहेत.
तर चंद्रविला संस्थेचे महेश देशमुख यांना ताब्यात घेऊन संस्थेच्या संपूर्ण दस्तावेजांची चौकशी करावी, आतापर्यत अशी ३० लग्न लावण्यात आली आहेत. एक लग्न लावून देण्यासाठी देशमुख यांनी पन्नास हजार रुपयांची रक्कम घेतल्याचाही आरोप बोंडे यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची पाळमुळे खोदून काढण्याची मागणी डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे.
मुलींच्या शाळेत करणार समुपदेशन
भारतीय जनता पक्ष, विश्व हिंदू परिषद बजरंग दल तसेच समविचारी संघटनांची मदत घेऊन जिल्ह्यातील संपूर्ण शाळा महाविद्यालयातील मुलींचे यासंदर्भात समुपदेशन करण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन सुद्धा डॉ.अनिल बोंडे यांनी केले आहे.