न्याय देण्यात विलंब म्हणजे न्याय नाकारणे; आदित्य ठाकरेंची नार्वेकरांवर टीका

न्याय देण्यात विलंब म्हणजे न्याय नाकारणे; आदित्य ठाकरेंची नार्वेकरांवर टीका

अपात्रतेची सुनावणी नोव्हेंबरपर्यंत चालणार असल्याची माहिती मिळणार आहे. यावरुन आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे.

मुंबई : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या सुनावणीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीचे वेळापत्रक ठरल्याची माहिती समोर आली आहे. अपात्रतेची सुनावणी नोव्हेंबरपर्यंत चालणार असल्याची माहिती मिळणार आहे. यावरुन आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. न्यायाला मुद्दाम उशिर करणं म्हणजे अन्याय करणंच आहे. फक्त आमच्यावर नाही, तर महाराष्ट्रावर, असे आदित्य ठाकरेंनी म्हंटले आहे.

न्याय देण्यात विलंब म्हणजे न्याय नाकारणे; आदित्य ठाकरेंची नार्वेकरांवर टीका
...तरी मुख्यमंत्री पद मिळत नाही; अमोल मिटकरींचा टोला

आदित्य ठाकरे म्हणाले की, मविआचं तत्कालीन सरकार कपटाने पाडून, त्या जागी घटनाबाह्य सरकार आणून भाजपाने महाराष्ट्रावर अन्याय केला. आता सभापती राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात चेंडू असताना (ट्रिब्यूनलची जबाबदारी असल्याने), असे दिसते की सभापती मुद्दाम विलंब करण्याचे डावपेच खेळून असंवैधानिक सरकारचं संरक्षण करण्यासाठी आपल्या क्षमतेच्या आणि चौकटीच्या पलीकडे जात आहेत. जगातली सर्वात मोठी लोकशाही असा दावा करणाऱ्या भारतात घटनाबाह्य सरकारचं अशा प्रकारे संरक्षण केलं जाताना पाहणं हे संतापजनक आहे.

सभापती लवकरच घाना येथे राष्ट्रकुल संसदीय परिषदेला भेट देणार आहेत, परंतु ते कोणत्या आधारावर अशा राज्याचे प्रतिनिधित्व करतील जिथे घटनाबाह्य, असंवैधानिक सरकार आहे आणि ज्याला बेकायदेशीर मार्गांनी संरक्षणही दिलं जातंय? ह्या साऱ्यामुळे जागतिक स्तरावर देशाची बदनामी होत असून, भारतात लोकशाहीच उरलेली नाहीये असे संकेत दिले जात आहेत, असे त्यांनी म्हंटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मे २०२३ मध्ये आदेश दिलेला असल्याने, सभापती अजूनही जलद न्याय देतील, अशी आम्हाला आशा आहे. (अजूनही!) हे फक्त एका पक्षाबद्दल नाहीये, तर महाराष्ट्राबद्दल आहे, आपल्या राज्यातल्या लोकांबद्दल आणि इथल्या लोकशाहीबद्दल आहे! त्यांना कश्याप्रकारे वागवलं जाणार आहे ह्याबद्दल आहे! संसदीय लोकशाहीची तत्त्वं न पाळता आणि राज्यघटनेचं संरक्षण न करता, निर्णय पूर्ण होण्याआधी संसदीय परिषदेसाठी परदेश दौरा करणं हे अयोग्य ठरेल. मुद्दाम वेळकाढूपणा करणं म्हणजे घटनेच्या विरोधात असलेल्यांना सभापतींचं संरक्षण असणं! पण लक्षात ठेवा, महाराष्ट्र पाहत आहे! भारत पाहत आहे! जग पाहत आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com