वाचाळवीरांना आवरा, मंत्री लोढांच्या वादग्रस्त विधानावर अजित पवारांचा शिंदे- फडणवीसांना सल्ला
राज्यात सध्या प्रचंड वादग्रस्त विधानांचे सत्र सुरु आहे. एक वाद शांत होत नाही तर दुसरा उफाळून येतो. आधी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर आता आज शिवप्रताप दिनीच भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी देखील वादग्रस्त विधान केले आहे. छत्रपती शिवरायांच्या जीवनातील एका प्रसंगाची तुलना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी केली आहे. या विधानामुळे प्रचंड वाद निर्माण झाला आहे. त्यावरच आता राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले अजित पवार?
मंत्री लोढा यांच्या विधानावर बोलताना अजित पवार म्हणाले की, वाचाळवीरांना आवरा असे मी सातत्याने सांगतो आहे. तरी देखील यांच्या मनामध्ये काहीना काही कल्पना अशा येतात ते बोलायला एक जातात आणि त्यातून अर्थ वेगळा निघतो. साधी भूमिका देखील या लोकांना कळत नाही. एकनाथ शिंदे स्टेजवर असातानाच त्यांच्या देखतच तुलना केली. आपण कोणाशी तुलना करतोय, काय करतोय आपल्याला जबाबादरी काय, आपण कसे बोलले पाहिजे, कसे वागले पाहिजे याचा विचार करावा. असे अजित पवार यावेळी म्हणाले.
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कोणाशी होऊ शकते का? हे महाराष्ट्रात कधी घडलंय का? याचेही तारतम्य या लोकांना राहिले नाही, अशा शब्दांत अजितदादांनी नाराजी व्यक्त केली. निवडणुका लागू दे...जनता यांना योग्य जागा दाखवेल, असे देखील ते म्हणाले.
काय म्हणाले होते मंगलप्रभात लोढा?
शिवप्रताप दिनी आज प्रतापगडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाषणादरम्यान मंगल प्रभात लोढा म्हणाले की, औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना डांबून ठेवले होते. पण, ते स्वराज्यासाठी बाहेर पडले. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देखील कोणीतरी डांबून ठेवले होते. पण, महाराष्ट्रासाठी ते बाहेर पडले, असे त्यांनी म्हंटले आहे. मंगलप्रभात लोढांच्या या वक्तव्यावरूनआता राजकीय वर्तुळात त्यांच्या पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे.