शरद पवारांनी घर चालवलं तसा पक्ष चालवला; अजित पवार गटाचा हल्लाबोल
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह कोणाचं यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर दुसऱ्यांदा सुनावणी सुरु आहे. यावेळी अजित पवार गटाने शरद पवारांवर आरोप करत जोरदार युक्तीवाद केला आहे. शरद पवारांनी घर चालवलं तसा पक्ष चालवला, असा हल्लाबोल करत अजित पवार गटाने शिवसेना प्रकरणाचा दाखला निवडणूक आयोगाला दिला आहे.
अजित पवार गटाकडून नीरज किशन कौल आणि मनिंदर सिंह हे युक्तिवाद करत आहेत. तर शरद पवार यांच्याकडून अभिषेक मनू सिंघवी हे युक्तिवाद करत आहेत. आमच्याकडे दीड लाखाहून अधिक शपथपत्र आहेत. यावर दादा गटानं कार्यकर्त्यांची ओळख पटवून द्यावी, अशी मागणी शरद पवार गटाने केली आहे. प्रत्येकाची ओळख पटवून देणं अशक्य असल्याचे अजित पवार गटाने म्हंटले आहे. सादिक अली केसचा दाखला देत आमदारांच्या संख्येला महत्व देण्यात आलं असल्याचा युक्तीवाद अजित पवार गटाने केला आहे. प्रफुल्ल पटेल पक्षाचे कार्याध्यक्ष त्यांच्या सहीने सर्व नियुक्त्या झाल्या आणि ते आमच्यारोबर आहेत, असेही अजित पवार गटाने म्हंटले आहे.
तर, पदाधिकाऱ्यांच्या फक्त नियुक्त्या व्हायच्या, निवडणूक व्हायच्या नाहीत. शरद पवारांनी सर्व नियम पायदळी तुडवले. ज्यांची निवड पवारांनी केली तेच पवारांची निवड कशी करू शकतात?जे स्वतः निवडून आले नाहीत ते इतरांच्या नेमणुका कशा करू शकतात, असा थेट आक्षेप अजित पवार गटाने शरद पवारांवर घेतला आहे.