'आम्हाला न्याय दिला' कारागृहातून बाहेर येताच देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी नेते अनिल देशमुख यांना 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल 1 वर्ष 1 महिना आणि 26 दिवसांनी कारागृहातुन सुटका झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात प्रचंड आनंदाचे वातावरण आहे. अनिल देशमुख कारागृहातून बाहेर आले तेव्हा कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. त्यावेळी राष्ट्रवादीचे मोठे नेते उपस्थित होते. सुटका झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
सर्वांचे मन:पूर्वक आभार मानतो
जेलमधून बाहेर येताच अनिल देशमुखांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, “माझ्यावर झालेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही, असंदेखील निरीक्षण हायकोर्टाने केलेलं आहे. न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. न्यायमूर्तींनी आम्हाला न्याय दिला. मी त्याबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार मानतो”, अशी पहिली प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली.
सचिन वाझेला आतापर्यंत दोन खुनांच्या आरोपांखाली अटक झालीय. त्याला तीनवेळा सस्पेंड करण्यात आलंय. एकदा त्याला सोळा वर्षांसाठी सस्पेंड करण्यात आलं. एकदा मुंबईतील उद्योगपतीच्या (मुकेश अंबानी) घराबाहेर बॉम्ब ठेवल्याप्रकरणी अटक झाली होती. अशा व्यक्तीवर विश्वास ठेवता येणार नाही, असं निरीक्षण हायकोर्टाने केलं. अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.
पुढं ते म्हणाले की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माझ्यावर 100 कोटींचा आरोप केला. पण त्याच परमबीर सिंह यांनी चांदीवाल कोर्टात जाऊन प्रतिज्ञापत्रक दिलं की, मी अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप केले ते ऐकीव माहितीवर केले. त्याच्याबद्दल माझ्याकडे काहीच पुरावा नाही. हायकोर्टाच्या निर्णयामध्ये जे हायकोर्टाने निरीक्षण केलेलं आहे, त्यामध्ये परमबीर सिंह यांच्या अतिशय जवळचा सचिन वाझे याच्यावर अतिशय गंभीर स्वरुपाचे आरोप आहे. अशा आरोपीच्या साक्षीवर विश्वास ठेवता येणार नाही, असेही अनिल देशमुखांना यावेळी सांगितलं.