अनुरागजी आमची केडीए्मसी फक्त सेटिंगमध्ये स्मार्ट, मनसे आमदार राजू पाटील यांनी काढला चिमटा
अनुराग ठाकूरजी आमची केडीएमसी फक्त सेटिंगमध्ये स्मार्ट आहे. मग ती टक्केवारीची असो की नवनवीन पुरस्कार असो, बरे झाले आपणच घरचा आहेर दिला आहे असा चिमटा मनसे आमदार राजू पाटील यांनी केडीएमसी प्रशासनाला काढला आहे. अनुराग ठाकूर यांनी खराब रस्त्याविषयी केडीएमसी आयुक्तांना खडे बोल सुनावल्यानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी हा चिमटा काढला आहे.
मनसे आमदार राजू पाटील हे वारंवार महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर टिका करतात. रखडलेले प्रकल्प असो की, रस्त्यावरील खड्डे असो. त्यावर राजू पाटील सातत्याने केडीएमसी प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न करतात. काही दिवसापूर्वी रखडलेल्या प्रकल्पा संदर्भात कल्याण शीळ रस्त्यावर बॅनरबाजी केली होती. हा बॅनर चर्चेचा विषय ठरला होता. आत्ता तर अनुराग ठाकूर यांनी आयुक्तांना खडेबोल सुनावले आहे. त्यानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी महापालिका प्रशासनाला चिमटा काढला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण ?
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे तीन दिवसीय कल्याण दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अनेक ठिकाणी जाऊन पाहणी केली. मात्र, केडीएमसीत रस्ते खराब रस्ते पाहून त्यांनी आयुक्तांना चांगलेच धारेवर धरले आहे. त्यावेळी ते म्हणाले की, स्मार्ट सिटीमध्ये हे शहर येते हे ऐकुन मी चकीत झालो असे म्हणत केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त करीत आयुक्तांना खडे बोल सुनावित स्मार्ट सिटीच्या कामाविषयी नाराजी व्यक्त केली होती.