अपेक्षेचे पीक उन्हात करपून गेले; बच्चू कडू मंत्रिपदावरुन अजूनही नाराज?
मुंबई : बच्चू कडू महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते, मात्र एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर बच्चू कडू यांनी देखील त्यांना साथ देत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, त्यांना सरकारमध्ये मंत्रिपद मिळेल, अशी चर्चा होती. मात्र मंत्रिपद मिळाले नसल्याने बच्चू कडू नाराज असल्याच्या बातम्या अनेकदा आल्या होत्या. त्यांनी ही नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती. यावर बच्चू कडूंनी भाष्य केले आहे.
बच्चू कडू म्हणाले की, मंत्रिपदावरुन मी नाराज नाही. दिव्यांग मंत्रालय स्थापन केले त्याचा आनंद मला आहे. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळाले तेव्हा आनंद झाला नसेल तेवढा मला दिव्यांग मंत्रालय झाल्याचा आनंद झाला. माझी नाराजी कोणावर नाही, असे त्यांनी सांगितले शिंदेसोबत मैत्री आहे, ते मुख्यमंत्री राहतील तोपर्यंत मी सोबत राहिल, असेही त्यांनी म्हंटले आहे.
तसेच, अपेक्षेचे पीक उन्हात करपून गेले. नवीन पेरणी जुन्या शेतातच होऊ शकते, पण कधी दुसऱ्या शेतातही नवी पेरणी होऊ शकते. एका मंत्रीपदाने काही होत नाही, त्यासाठी दबाव असला पाहिजे, ते वजन आमच्याकडे नाही, असेही बच्चू कडूंनी म्हंटले आहे. तर, मला किंगमेकर व्हायचं नाही, शेतकऱ्यांचा कार्यकर्ता व्हायचा आहे, असेही त्यांनी सांगितले.