Balasaheb Thorat
Balasaheb ThoratTeam Lokshahi

रस्त्यांवर खड्डेच खड्डे मग टोल कशाचे घेता? बाळासाहेब थोरात

विद्यमान ट्रिपल इंजिन सरकारने महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत दयनीय करून टाकली आहे.
Published by :
Team Lokshahi

नाशिक: येथे उत्तर महाराष्ट्र विभागीय आढावा बैठकीच्या निमित्ताने पत्रकारांशी संवाद साधताना, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी संतापजनक सवाल उपस्थित केला आहे. रस्त्यावर असणारे खड्डे आणि त्यावर जर मार्गच काढायचा नसेल तर टोल कशाचा घेता? असा त्यांनी सरकारला सवाल केला आहे. विद्यमान ट्रिपल इंजिन सरकारने महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत दयनीय करून टाकली आहे. राज्यातल्या सर्वच प्रमुख रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे, गाडी चालवणे आणि प्रवास करणे, हे जीवावर बेतणारे आहे. रस्त्यावरचा प्रत्येक खड्डा महायुती सरकारच्या नाकर्तेपणाची साक्ष देतो, असे म्हणत थोरातांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

Balasaheb Thorat
रोहित पवारांनी राज ठाकरेंना का दिला पाठिंबा?

नाशिक मुंबई महामार्गाची परिस्थिती वाईट आहे. अडीच तासांच्या प्रवासाला चार ते साडेचार तास लागतात. एका एका जागेवर तासभर प्रतीक्षा करावी लागते. भिवंडीमध्ये तर रस्ता कोणता आणि खड्डे कोणते हे शोधणे मुश्किल झालेले आहे. भिवंडीतली वाहतूककोंडी जीवघेणी ठरते आहे. या महामार्गावर झालेल्या खड्यांबद्दल कोणीही चकार शब्द बोलायला तयार नाही, टोलची वसुली मात्र बिनबोभाट सुरू आहे. हीच परिस्थिती राज्यातल्या सगळ्यात महामार्गांची झालेली आहे. जनमानसात असंतोष वाढत आहे, असे थोरात म्हणाले.

रस्त्यांच्या या अवस्थेवर जनतेच्या मनात प्रचंड संताप आहे. मंत्री महोदयांनी तातडीने त्यावर कारवाई करतो असे आश्वासनही दिले. मुख्यमंत्री महोदयांनाही आम्ही या प्रश्नाचे गांभीर्य समजावून सांगितले होते, मात्र वाहतूक कोंडीत सुधारणा होण्याऐवजी वाढ झालेली आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

मुंबईला जाण्यासाठी अनेक जण रेल्वेचा पर्याय अवलंबतात. सत्ताधारी अनेक आमदारांना माझी विनंती आहे की एकदा रेल्वे ऐवजी गाडीने या रस्त्यावरून प्रवास करून बघा, म्हणजे तुम्ही सुद्धा या रस्त्याची दयनीय अवस्था मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून द्याल, असे म्हणत त्यांनी सरकारवर संताप व्यक्त केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com