सरकारच्या तारखेविषयी बोलण्यापेक्षा स्वतःच्या 'लग्नतिथी'चा विचार करावा; भाजपचा आदित्य ठाकरेंना खोचक सल्ला
मुंबई : राज्यात सध्या प्रचंड राजकीय घडामोडी घडत आहे. शिवसेना नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्यामुळे ठाकरे गट आक्रमक झाली आहे. तर, ठाकरे गटाकडून शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याचा दावा केला जात आहे. याचवरुन भाजप नेते प्रसाद लाड यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. सरकारच्या तारखेविषयी बोलण्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या 'लग्न तिथी'चा विचार करावा, अशी जोरदार टीका लाड यांनी केली आहे.
प्रसाद लाड यांनी ट्विटर अकाउंटवरुन आदित्य ठाकरेंवर लग्नासंदर्भात टीका केली आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेते युवराज आदित्य ठाकरे यांनी बहुदा पोपटशास्त्र सुरू केले असावे. ते रोजच 'तारीख पे तारीख' देत आहेत. परंतु, यातून केवळ त्यांची हताश आणि निराश अवस्था दिसून येते. सरकारच्या तारखेविषयी बोलण्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या 'लग्न तिथी'चा विचार करावा, असा टोला त्यांनी लगावला आहे.
दरम्यान, आदित्य ठाकरेंनी वरळी येथे निर्धार मेळाव्यात शिंदे-फडणवीस सरकारवर शरसंधान साधले आहे. सध्याचे मुख्यमंत्री घटनाबाह्य आहेत. हे अल्पायुषी सरकार आहे. हे सरकार कोसळणारच आहे. हे थोड्या दिवसांचे सरकार आहे. त्यांच्या-त्यांच्यातच भांडणं लागली आहेत, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला होता. तसेच, मी आमदारकीच राजीनामा देतो तुम्ही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या. आणि ठाण्यात निवडणूक लढतो होऊन जाऊ द्या एकदा, असे आव्हानदेखील त्यांनी दिले आहे.