विश्वासघात कोणी केला हा सवाल पटोलेंनी आधी थोरातांना विचारावे- विखे पाटील
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. दुसरीकडे राज्यात विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांसाठी निवडणूका जाहीर झाल्या आहेत. त्यातच नाशिकच्या जागेबाबत मोठा पेच निर्माण झाला होता. डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. त्यांनी अर्ज न भरता मुलाला अर्ज भरायला लावला. यावरून काल राजकीय वर्तुळात एकच गदारोळ निर्माण झाला होता. त्यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तांबे पिता- पुत्रांवर टीका केली होती. त्यावरच आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला आहे.
सत्यजित तांबे यांनी विश्वासात केल्याच्या नाना पटोले यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांनी टोला लगावला. विश्वासघात कोणी केला हा सवाल नाना पटोलेंनी आधी बाळासाहेब थोरात यांना विचारावा. बाळासाहेब थोरतांना विचारलं पाहिजे की विश्वासघात झाला की नाही की हे सर्व त्यांच्या सहमतीने झाले हे मला माहित नाही. बाळासाहेब थोरात यांचे सत्यजीतच्या या निर्णयाला समर्थन आहे का? असा टोलाही विखेंनी लगावला.
पुढे ते म्हणाले, सत्यजीत यांनी अपक्ष उभं राहण्याचा निर्णय स्वतः घेतला की पक्ष नेतृत्वाला विचारले हे मला माहिती नाही. भाजपने जर सत्यजीत यांना पाठिंबा द्यायचं ठरवलं तर मी त्यांचं स्वागतच करेन. पक्षात कोणाला घ्यायचे याचा निर्णय पक्षश्रेष्ठी करते त्याला आमचा विरोध असण्याचे काही कारण नाही. असे देखील मत विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
काय म्हणाले होते नाना पटोले?
नागपुरामध्ये बोलताना आज नाना पटोले म्हणाले की, ही पक्षासोबत फसवेगिरी आहे. तर सत्यजीत तांबे यांनी आपण भाजपचा पाठिंबा घेणार असल्याचे विधान केले. तांबे पिता-पुत्रांनी पक्षासोबत मोठा दगाफटका केला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी नाना पटोले यांनी यावेळी दिली आहे.