'धरणवीर' ला 'धर्मवीर' कसे समजणार, नितेश राणेंची अजित पवारांवर टीका
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच एकापाठोपाठ एक वादग्रस्त विधानांचे सत्र राजकीय मंडळींकडून सुरु आहे. याच दरम्यान काल हिवाळी अधिवेशनात विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल एक विधान केले होते. त्या विधानावरून सध्या प्रचंड वादंग निर्माण झाले आहे. त्यावरूनच आता भाजप आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
काय म्हणाले नितेश राणे?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या विधानाचा समाचार नितेश राणे यांनी ट्विटरवरून घेतला आहे. ते म्हणाले की, “धरणवीर” ला “धर्मवीर” कसे समजणार .. आता धर्म रक्षणासाठी .. तलवार नको “शाही पेन” ही चालेल.. हर हर महादेव !!! असे ते यावेळी म्हणाले आहे.
काय म्हणाले होते अजित पवार?
महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेला खतपाणई घातलं जात नाही. बाल शौर्य पुस्कार हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी कधीच धर्माचा पुरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पण काहीजण जाणीवपूर्वक धर्मवीर उल्लेख करतात. मी मंत्रिमंडळात असतानाही त्यावेळी स्पष्ट सांगितलं होतं, संभाजी महाराजांचा उल्लेख हा स्वराज्यरक्षक असाच करावा, असे अजित पवार कल म्हणाले होते.