राज्यपाल कोश्यारींवर केलेल्या विरोधकांच्या टीकेला बावनकुळेंचे प्रत्युत्तर; म्हणाले, नियमबाह्य कामं केली...
केंद्र सरकारने देशभरातील 13 राज्यातील राज्यपाल आणि उपराज्यपाल यांच्यात बदल केले आहेत. परंतु, यामध्ये सर्वाधिक चर्चेत राहिले ते महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा आज राष्ट्रपतींनी मंजूर केला आहे. आता राज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस असणार आहेत. त्यामुळे राज्यपालांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर विरोधीपक्षाकडून एकच प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आल्यामुळे राज्यपालांवर आता राजीनामा दिल्यानंतर देखील टीकेची झोड सुरु आहे. याच टीकेला आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत विरोधकांना चांगलेच सुनावले आहे.
नेमकं काय म्हणाले बावनकुळे?
राज्यपालांवर होणाऱ्या विरोधकांच्या टीकेला उत्तर देतांना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज्यपालांनी अनेक असंवैधानिक कामाना लगाम घालती. नियमबाह्य कामं केली नाहीत. म्हणून विरोधकांचा त्यांच्यांवर राग दिसून येत आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी शिवरायाची प्रेरणा घेवून काम केले. त्यामुळेच केंद्र सरकारने उलट त्यांचा सन्मान केला आहे.सर्वाधिक वाचाळवीर महाविकास आघाडीत आहेत, अशी बोचरी टीका त्यांनी यावेळी केली.
पुढे त्यांनी संजय राऊत यांच्या विधानावर निशाणा साधला ते म्हणाले की, जेलमध्ये राहून आल्यामुळे संजय राऊत यांना संवैधानिक असंवैधानिकमधला फरक कळत नाही. ते ज्या लोकांबरोबर राहून आले आहेत, आता त्यांच्यासारखे वागू लागले आहेत. अशी विखारी टीका त्यांनी राऊतांवर केली आहे.