अर्थसंकल्पावर भाष्य करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज 2023-24 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी या सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. यावेळी निर्मला सीतारमण यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. जच्या या अर्थसंकल्पावर सर्वच देशाचे लक्ष लागून होते. त्यावरच आता बजेट सादर झाल्यानंतर या बजेटवर आता विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली. याच अर्थसंकल्पानंतर आता केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. परंतु, या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना ( ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
काय म्हणाले नारायण राणे?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्प सादर केला आहे. याच अर्थसंकल्पावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केलं. मात्र, या पत्रकार परिषदेतही नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची संधी सोडली नाही. येणाऱ्या आगामी निवडणुकीत मुंबईत आम्ही भाजपची सत्ता आणणार म्हणजे आणणारच. याचे कारण म्हणजे शिवसेनेने मुंबईला लुटलं आहे. पण आता बस्स झालं, यांनी मुंबईला इतकं लुटलं की 'यु' आणि 'आर' नावाने हप्ते जात होते. मुंबईला यांनी विदृप करुन टाकलं आहे. अशी टीका त्यांनी नाव न घेता ठाकरेंवर केली.
पुढे ते म्हणाले की, आम्ही मुंबईसाठी तरतूद करत आहोत. तसेच मुंबईसाठी तरतूद करायला आम्ही लावू. मुंबईला कोणत्याही प्रकल्पासाठी पैसे लागले तर आम्ही ते उपलब्ध करून देऊ. यासाठी ते आमचे ऐकतील एवढा आम्हाला विश्वास आहे. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पत्रकार आणि नारायण राणे यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची
विशेष म्हणजे या पत्रकार परिषेद राणे पत्रकारांवर भडकल्याचेही दिसून आले. पत्रकारांनी पेट्रोल आणि गॅस सिलिंडर दरवाढीवरून प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले की, तुम्ही पत्रकार नाही तर सोशल वर्कर झाला आहात. नाहीतर शिवसेनेचे प्रवक्ते झाले आहात. असं राणे म्हणाले. मात्र, यावर पत्रकारांनी आक्षेप घेतला. यामुळे काही वेळ पत्रकार आणि नारायण राणे यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झालेली पाहायला मिळाली.