भाजपने पक्षाचं नाव बदलून भ्रष्ट जनता पार्टी असं ठेवावे; उद्धव ठाकरेंची जोरदार टीका
आज छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पर पडली. या माजी मुख्यमंत्री व शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, विरोधीपक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रांतअध्यक्ष जयंत पाटील, माजी मुख्यमंत्रीअशोक चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित राहिले आहेत. यावेळी मविआच्या सर्वच नेत्यांनी सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. यावेळी सभेत बोलताना शिवसेना ठाकरे गट पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपवर सडकून टीका केली.
काय केली उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका?
वज्रमूठ सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपाचं म्हणजे दिसला भ्रष्ट, घेतला पक्षात असं चाललंय. देशभरातली भ्रष्ट माणसं या पक्षात आहेत. आणि नाव भाजपा आहे. जर भारतीय जनता पक्ष म्हणून तुम्ही भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेत असाल, तर पक्षाचं नाव बदलून भ्रष्ट जनता पार्टी असं ठेवा. आम्ही तुमचं हिंदुत्व मानायला तयार नाही आहोत. देशात एक विधान, एक निशाण असं तुम्हाला राबवायचं आहे. दुसरा पक्षच तुम्हाला शिल्लक ठेवायचा नाहीये. देशाची अध्यक्षीय हुकुमशाहीच्या दिशेनं वाटचाल चालू आहे. सावरकरांचं स्वप्न होतं आसिंधू-सिंधूपर्यंत अखंड हिंदुस्थान. वर बसलेल्यांची हिंमत आहे का? अमित शाह म्हणाले होते की शिवसेनेला जमीन दाखवायची आहे. मी म्हटलं मला जमीन बघायचीच आहे. जमीन दाखवायची असेल, तर पाकव्याप्त काश्मीरची एक इंचतरी जमीन जिंकून दाखवा, मग आम्ही तुम्हाला मानी. नाहीतर पुचाट लेकाचे हिंदुत्वाच्या गप्पा करू नका. अशा शब्दात त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
पुढे ते म्हणाले की, नड्डा म्हणाले शिवसेनेला नामशेष करा. आधी तुम्ही शिवसेना पेलतेय का ते बघा. आम्ही भाजपा संपवल्याशिवाय राहणार नाही. मोठी केलेली माणसं गेलीत, पण त्यांना मोठं करणारी माणसं आज माझ्यासोबत आहेत. आता महाविकास आघाडीची वज्रमूठ आहे. ही वज्रमूठ राज्यघटनेचं, भारतमातेचं रक्षण करण्यासाठी आहेत. तुम्ही आम्हाला विचारताय याच्या थोबाडीत माराल का? आधी स्वत:च्या कानफटात मारून घे. आमचं हिंदुत्व शेंडी-जाणव्याचं हिंदुत्व नाहीये. मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नकोय, अतिरेक्यांना बडवणारा हिंदू हवाय हे शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं होतं. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. असे देखील त्यांनी यावेळी भाजपला ठणकावून सांगितले.
त्यानंतर ते म्हणाले, मी माझ्या वडिलांचं नाव सोडणार नाही. पुन्हा एकदा सांगतो त्यांना. हिंमत असेल, अगदी भाजपातही हिंमत असेल, तर तुम्ही मोदींना घेऊन महाराष्ट्रात या, मी माझ्या वडिलांचं नाव घेऊन महाराष्ट्राच्या मैदानात येतो. होऊन जाऊ द्याय. जेव्हा हवं तेव्हा वापर करुन घेतलात. काय काय चालली होती तुमची थेरं? उद्धव ठाकरेला एकटा पाडायचा. पण आज माझ्याकडे काहीही नसताना काँग्रेस, राष्ट्रवादी, मित्रपक्ष कठीण काळातही सोबत आहेत. काय तुम्ही माझं चोरणार? माझ्या आई-वडिलांचे आशीर्वाद माझ्यासमोर बसलेत. ते तर तुम्ही चोरू शकत नाही ना? तुम्हाला विचार दुसऱ्यांचे लागतात. सभेतही वाचू का, वाचू का विचारता. त्यांना मला सांगायचंय, की तुमच्यासमोर ठेवलेलं कदाचित तुम्ही वाचाल, पण ही जनता जेव्हा मतदानाला उतरेल, तेव्हा तुम्ही वाचू शकणार नाही. असा देखील इशारा त्यांनी यावेळी भाजपला दिला.