संकटाच्या काळात मी आणि देवेंद्र फडणवीस संजय राठोडांसोबत होतो- एकनाथ शिंदे
महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात वनमंत्री असलेले संजय राठोड चांगलेच अडचणीत सापडले होते. पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी विरोधीपक्षाकडून त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. या आरोपांनंतर राठोड यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता. परंतु आता त्यांना पुणे पोलिसांनी याप्रकरणी क्लिनचिट दिली होती. परंतु, आता सत्तांतर झाल्यानंतर राठोड पुन्हा मंत्री झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोहरगडावरून ठाकरे गट पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवी येथे ५९३ कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन व संत सेवालाल महाराजांचा पंचधातूच्या पुतळ्याचे अनावरण तसेच सर्वात मोठ्या सेवाध्वजाची स्थापना सोहळा रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, पोहरागड म्हणजे पवित्र काशी आहे. इथे येण्याचे भाग्य आम्हाला मिळाले. बंजारा समाज निसर्गपूजक असून मेहनत करणारा आहे. संजय राठोड हे सातत्याने या भागातील विकासाकामांसाठी पाठपुरावा करत असतात. त्याच्याच पार्श्वभूमीवर ५९३ कोटींचा अश्वारुढ पुतळा या ठिकाणी घेतला आहे. नवी मुंबई येथे बंजारा समाजाचे बोर्ड स्थापन करणार आहे. त्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी बंजारा समाजाला देण्याची घोषणा करत आहे. सोबतच त्यांनी विविध विकास कामांची घोषणा केली.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राठोडांवर ज्या ज्यावेळी संकटं आली. तेव्हा बंजारा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला. समाजाबरोबर सगळे येतात. संकटात साथ देणारा खरा मित्र असतो. पण काही लोकांनी त्यावेळी हात वर केले. मात्र, त्या संकटकाळात मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्ही दोघंही राठोडांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलो. सुखात सगळेच येतात पण दु:खात सोबत करणं गरजेचं असतं. असेही मुख्यमंत्री शिंदेंनी रोखठोकपणे सांगतिले.