'पिढ्यान् पिढ्या निष्ठा ठेवणारे थोरात' केदारांकडून थोरातांची पाठराखण
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच काँग्रेसमध्ये नाशिक पदवीधर निवडणुकीपासून वाद निर्माण झाला आहे. त्यातच काँग्रेसमध्ये देखील दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीये. या वादात आता काँग्रेसमध्यल्या अनेक नेत्यांनी उडी घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर आता कॉंग्रेस नेते माजी मंत्री आमदार सुनील केदार यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची बाजू घेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबाबत कठोर भूमिका घेतली आहे.
माध्यमांशी बोलताना आमदार सुनील केदार म्हणाले की, बाळासाहेब थोरात यांच्यासोबत राज्यातील काँग्रेसचे नेते आहेत. थोरात गेल्या अनेक वर्षांपासून पक्षात आहेत. अनेक राजकीय घडामोडींचे ते साक्षीदार आहेत. अनेक लोक इतर पक्षांत गेले, मात्र थोरात काँग्रेसमध्ये कायम आहेत. मात्र सध्या जो विषय पुढं येतोय, ते पक्षाच्या दृष्टिकोनातून योग्य नाही. यामुळे पक्ष कुठेतरी मागे पडत चालला आहे. पक्षातील कलह पक्षातच सुटला पाहिजे, असे केदार यांनी मत मांडले.
तर पुढे ते म्हणाले की, केंद्रातील पक्षश्रेष्ठी हा प्रश्न निकाली काढतील. मात्र केंद्रातील नेत्यांची गरज भरायला नको. पिढ्यान् पिढ्या निष्ठा ठेवणारे राज्यातील नेते हा प्रश्न निकाली काढतील. आमच्या पक्षाच्या अंतर्गत असलेला प्रश्न आम्हीच सोडवू. थोरात साहेबांचा सन्मान झालाच पाहिजे. तुम्ही कितीही आकाशाला पोहोचला तरी आणि तुम्ही कितीही मोठे झाले असे समजत असाल तरीही थोरात साहेबांचा सन्मान केला पाहिजे. त्यांना आम्ही सांभाळू, असे म्हणत केदारांनी नाना पटोलेंना इशाराच दिला.