अतुल लोंढेंची मंत्री सत्तारांवर टीका; म्हणाले, हिंदुत्वासाठी गेले आणि...
राज्यात सध्या प्रचंड राजकीय घडामोडी घडत आहे. त्यातच नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन पार पडत आहे. मात्र, या अधिवेशनादरम्यान गोंधळ होताना दिसत आहे. अनेक विषयावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जुंपलेली दिसत आहे. शिंदे-भाजप सरकारमधील कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गायरान जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहे. यावरुन अधिवेशनात विरोधकांनी सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यावरच आता काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी देखील अब्दुल सत्तार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
अतुल लोंढे म्हणाले की, अवैध पद्धतीने आलेले सरकार अवैध कामं करत आहे. हे असंवैधानिक सरकार असून मंत्री अब्दुल सत्तार हिंदुत्वासाठी गेले आणि गोमातेचेच गायरान खाऊन बसले. अशी टीका त्यांनी सत्तारांवर केली.
पुढे ते म्हणाले की, एकीकडे गाईचे गायरान खाऊन टाकायचं. तिकडे महोत्सवाच्या नावाने वसूली करायची आणि तडफडणाऱ्या शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करण्याचे काम कृषिमंत्री अब्दुल सत्तार करत आहेत. अतिवृष्टीमुळे तूर, सोयाबिन, कापूस पिक वाया गेले, त्याची यांना चिंता नाही. शेतकरी मरतो की जगतो, ते पाहायला यांना वेळ नाही. युवक बेरोजगारीने नाडला गेलाय, एमपीएससीचा बट्ट्याबोळ झालाय, त्याचीही चिंता नाही. यांना चिंता आहे ती फक्त आपली वसूली कशी होणार? असेही अतुल लोंढे म्हणाले.