'सत्यजीत तांबे यांनी ओके असंही म्हटलं' सत्यजीत तांबेंच्या आरोपांवर काँग्रेसचं उत्तर
राज्यात नुकताच शिक्षक आणि पदवीधर निवडणुक पार पडली. परंतु, या सर्वात जास्त चर्चेत आली ती नाशिक पदवीधर निवडणुक. कारण या जागेमुळे मोठा पेच निर्माण झाला होता. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली. प्रचंड गोंधळ झाल्यानंतर आता सत्यजीत तांबे हे निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले. मात्र, आज पत्रकार परिषद घेऊन सत्यजीत तांबेंना महाराष्ट्र काँग्रेस आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले. याच आरोपांवर आता काँग्रेसकडून उत्तर देण्यात आले आहे.
काँग्रेसकडून काय आले उत्तर?
सत्यजीत तांबे यांच्या आरोपावर बोलताना काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, ते फॉर्म काँग्रेसच्या वतीनं बाळासाहेब थोरात यांच्या ओएसडींना देण्यात आले होते, त्या फॉर्मचा स्क्रिनशॉट पाठवण्यात आला होता. त्यावर सत्यजीत तांबे यांनी ओके असं उत्तरही मोबाईलवरून दिलं होतं. सत्यजित तांबेंनी केलेले सर्व आरोप चुकीचे आहेत. पक्षाचे प्रश्न पक्ष पातळीवरच सोडवले पाहिजेत. सत्यजित तांबेनी कोणत्याही गोष्टीचं व्यवस्थित उत्तर दिलं नाही. तर पक्षाने योग्यच एबी फॉर्म दिला होता, त्यावर सत्यजीत तांबे यांनी ओके असंही म्हटलं होतं, त्यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. असे लोंढे यांनी यावेळी सांगितले. सोबतच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, सत्यजीत तांबे यांच्या विषयावर मी काही बोलणार नाही, ते काम पक्षाचे प्रवक्ते करतील
काय केले होते सत्यजीत तांबेंनी आरोप?
वडील डॉ. सुधीर तांबे आणि बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मी निवडणूक लढवणार असा आम्ही निर्णय घेतला. त्यानंतरही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून दोन वेळेला चुकीचे एबी फॉर्म पाठवण्यात आल्याचं सत्यजित तांबे यांनी सांगितलं. ते म्हणाले, ९ जानेवारीला एबी फॉर्म पाहिजे म्हणून प्रदेश कार्यालयाला संपर्क केला. त्यानुसार १० तारखेला माझा माणूस नागपूरला पोहोचला. संध्याकाळी ७ वाजेपर्यंत तो बसून राहिला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा फोन आला. दोन एबी फॉर्म घेऊन पाठवतोय. विधान परिषदेचे एबी फॉर्म असल्याने ते सीलबंद होते. 11 तारखेला सकाळी माणूस पोहोचला. फॉर्म भरायला सुरुवात केली. त्यावर डॉ. सुधीर तांबे यांचं नाव होतं. पर्यायी उमेदवाराचं नावाच्या ठिकाणी नील होतं. पाकिट फोडलं तेव्हा चुकीचे एबी फॉर्म पाठवल्याचं समोर आलं. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे ते फॉर्म नव्हते. एक औरंगाबादचा आणि दुसरा नागपूर शिक्षक मतदार संघाचा फॉर्म असल्याचं कळलं. एबी फॉर्मसारखा महत्त्वाचा मुद्दा एवढा प्रदेश कार्यालयानं गहाळपणे का करावा?, असा सवाल सत्यजित तांबे यांनी केलाय.