'निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन हा अर्थसंकल्प सादर' अर्थसंकल्पावर ठाकरे गटाची टीका
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज 2023-24 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यावेळी निर्मला सीतारमण यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी या सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. मात्र, दुसरीकडे या संकल्पावरून समर्थन- विरोध सुरु असताना आता ठाकरे गटाने या बजेटवर सडकून टीका केली आहे. या अर्थसंकल्पातून सामान्यांना गाजर दाखवण्यात आलं आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे.
काय म्हणाले अरविंद सांवत?
अर्थसंकल्पावर माध्यमांशी बोलताना अरविंद सावंत म्हणाले की, मध्यमवर्गीयांचे संपूर्ण आयुष्य होरपळत गेले. त्यांच्या्साठी इपीएसचा एक शब्द नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरचा हा अर्थसंकल्प आहे. शेतकरी कामगार आणि बेरोजगारांसाठी या बजेटमध्ये काहीही नाही. भाजपचे प्रत्येक निर्णय सामाजिक आणि राष्ट्रीय दृष्ट्या कधीच महत्त्वाचे नसतात. फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बजेट मांडला आहे. असा आरोप सावंत यांनी यावेळी केला आहे.
अर्थसंकल्पातून कर्नाटकाला मोठं पॅकेज दिलं आहे. त्यावरही अरविंद सावंत यांनी टीका केली. कर्नाटकाला केंद्र सरकारने 5 हजार 300 कोटी रुपये दिले आहेत. पण महाराष्ट्राला काहीही दिलं नाही. अर्थसंकल्पातून सामान्यांना गाजर दाखवण्याचं काम झालं आहे. निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. एससी, एसटी, ओबीसी योजनांचा दोन तीन वेळा उल्लेख केला. कररचनेत थोडा बदल केलाय. त्यानं थोडा दिलासा मिळला. असं सावंत म्हणाले.