'राष्ट्रवादी साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष' फडणवीसांची टीका; जयंत पाटीलांचे प्रत्युत्तर,म्हणाले...
राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत असताना दुसरीकडे कर्नाटक विधानसभा निवडणुकीवरून महाराष्ट्रातील वातावरण तापले आहे. आज या कर्नाटक निवडणुकीचा प्रचार थंडावला. मात्र, या निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील नेतेही कर्नाटकात प्रचार केला. याच प्रचारादरम्यान, निपाणीतील एका प्रचार सभेत रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केलं होते. त्यांच्या याच टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर देत फडणवीसांच्या विधानाचा समाचार घेतला.
काय म्हणाले जयंत पाटील?
फडणवीसांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना जयंत पाटील म्हणाले की, 'राष्ट्रवादीला जे कुणी साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष म्हणत असतील. त्यांचा भाजपाने फौजदाराचा हवालदार केला आहे. ज्यांना स्वत:चं स्थान टिकवता आलं नाही. त्यांनी आमची माप काढवीत का? असा सवाल त्यांनी केला.
पुढं ते म्हणाले की, 'जनतेनं आमचं सरकार स्वीकारलं असताना, आमच्यातील लोक फोडण्याचं पाप केलं. नंतर आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळेल, असं वाटलं होतं. पण, दिल्लीतील लोकांनी दुसऱ्यांनाच मुख्यमंत्री केलं. गडचिरोली, जळगाव आणि भंडाऱ्यापर्यंत आमचा पक्ष पसरला आहे. आमचा पक्ष साडेतील जिल्ह्यांचा नाही. शरद पवारांच्या झंझावातात राष्ट्रवादी काँग्रेस २०२४ साली सर्वात मोठा पक्ष होणार आहे. कार्यकर्त्यांना आयुष्यभर सांभाळण्याचं काम शरद पवारांनी केलं आहे.' असं जयंत पाटील म्हणाले.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
'निपाणीत राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आहे. पण, हा महाराष्ट्रातील साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष आहे. कर्नाटकात येऊन काय करणार? येथे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मिलीभगत आहे. हे पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या, त्याचं काय करायचे बघतो' अशी टीका फडणवीसांनी केली होती.