नामांतराच्या श्रेयवादावरून फडणवीसांचा विराेधकांना टोला; म्हणाले, अख्खा महाराष्ट्र बदलून...
काल केंद्र सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतराला अखेर मंजुरी दिली. हा प्रस्ताव अनेक दिवसांपासून केंद्र सरकारकडे प्रलंबित होता. या केंद्र सरकारच्या निर्णयाचे आता सर्वांकडून स्वागत होत आहे. तर दुसरीकडे यावरून आता श्रेयवादासह आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात वातावरण तापले आहे. याच श्रेयवादावरून आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना निशाणा साधला आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
पुण्यात माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काही लोकांना वाटत की सगळी कामे त्यांच्या काळातच झाली. त्यांचा काळ अडीच वर्षांचा. त्यातील सव्वादोन वर्षांचा काळ घराच्या दाराआड गेला. उरलेल्या अडीच महिन्यांत त्यांनी अख्खा महाराष्ट्र बदलून टाकला असेन, तर मला माहिती नाही. असा टोला त्यांनी ठाकरेंना लगावला.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा निर्णय आम्हीच घेतल्याचा दावा केला. ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आमच्या सरकारने नामांतराचा मंत्रिमंडळात निर्णय घेतला. त्याबाबत केंद्राकडे प्रस्ताव पाठविला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तो प्रस्ताव मान्य केला. यावर ते कदाचीत म्हणतील की त्यांनीच मोदींना फोन केला म्हणून हा प्रस्ताव मान्य झाला. अशी देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले.