उदयनराजे यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहोचल्या, उदयनराजेंच्या भूमिकेवर फडणवीसांचे विधान
राज्यपाल भगतसिंग यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. राज्यपालांच्या या विधानामुळे राज्यात प्रचंड वादंग निर्माण झाले होते. यावर आज थेट छत्रपती घराण्याचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत राज्यपालांच्या विरोधात रोखठोक भूमिका मांडली. यावेळी उदयनराजे भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. यावरच आता उदयनराजे यांच्या भूमिकेला पाठिंबा असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. उदयनराजे यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहोचल्या आहेत” असे फडणवीस यावेळी म्हणाले.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत राज्यपालांच्या विरोधात भूमिका मांडली यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, उदयनराजे यांच्यापाठिशी आम्ही सगळे आहोत. छत्रपतींचे वंशज कधीच हतबल होऊ शकत नाहीत. त्यामुळे ते भावनेतून बोलले असले तरी महाराष्ट्र आणि देश त्यांच्या पाठिशी आहे. उदयनराजे यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहोचल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
पुढे ते म्हणाले की, शेवटी राज्यपाल हे पद संवैधानिक पद असते. ते सरकारच्या हाती नसते. सरकार त्यात काही करु शकत नाही. राज्यपालांवर कारवाई करण्याचे सर्व अधिकार राष्ट्रपतींचे असतात. त्यामुळे मला असे वाटते की, उदयन महाराज हे समजून घेतील. पण त्यांच्या भावनेच्या पाठिशी आम्ही ठामपणे उभे आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठं प्रेरणास्त्रोत दुसरे कोणी असूच शकत नाही. आमच्या सगळ्यांचे प्रेरणास्त्रोत तेच आहेत. महाराष्ट्र आणि देशाचे आदर्श तेच आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.