कंत्राटी पोलीस भरती? फडणवीस म्हणाले, केवळ मनुष्यबळ नाही म्हणून...
मुंबई : राज्यामध्ये बेरोजगारीचा गंभीर विषय असताना राज्यात कंत्राटी पद्धतीने ३ हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. या निर्णयावरुन विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. यावर अखेर देवेंद्र फडणवीसांनी अधिवेशानात खुलासा केला आहे. कुठल्याही स्थितीत पोलीस भरती कंत्राटी स्वरूपात होणार नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
पोलिस भरती कंत्राटी नाही. सेवानिवृत्ती, आंतर जिल्हा बदली, कोविडचे मृत्यू, तसेच 2019, 2020, 2021 साली पोलीस भरती झाली नाही. आता 18 हजार 311 पोलीस भरती केली जात आहे. यात मुंबईत 7 हजार 076 पोलिस शिपाई आणि 994 चालक पदे आहेत. नवीन भरती करून, त्यांचे प्रशिक्षण पूर्ण होऊन सेवेत दाखल होईस्तोवर तात्पुरते म. रा. सुरक्षा महामंडळाकडून मनुष्यबळ घेतले जात आहे, अशी स्पष्टोक्ती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.
तसेच, केवळ मनुष्यबळ नाही, म्हणून मुंबईची सुरक्षा वाऱ्यावर सोडता येणार नाही. कुठल्याही स्थितीत पोलीस भरती कंत्राटी स्वरूपात होणार नाही. अन्य विभागात जी भरती आहे, त्यात काही संस्थांच्या नेमणुकीच्या मंत्रिमंडळ निर्णयात सुधारणा करण्यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.