Devendra Fadnavis : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करणार
मुंबई : राज्यातील ९१ नगरपालिकांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाविनाच (OBC Reservation) घेण्याचे निर्देश आज सर्वोच्च न्यायालायाने (Supreme Court) दिले आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी न्यायालयाच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले असून पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात ओबीसीचे राजकीय आरक्षण लागू झाले होते. सर्वोच्च न्यायालायने हा निर्णय घेत असताना ९१ नगरपालिकांचा समावेश ग्रामपंचायती सोबत केला. त्यामुळे ही समस्या निर्माण झाली. याविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
जर राज्यात ओबीसी आरक्षण लागू झालं आहे. मग या ९१ नगरपालिकांमध्ये लागू व्हावं, अशी विनंती आम्ही न्यायालयाला केली होती. मात्र, न्यायालयाने ही सुधारणा करण्यास नकार दिला. त्यामुळे आम्ही पुन्हा सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, ओबीसी आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या हिरव्या कंदिलानंतर पुन्हा सर्व निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्याच्या हालचाली राज्य शासनानं सुरु केल्या होत्या. मात्र, निवडणुकांसाठी कोणत्याही प्रकारची नवीन अधिसूचना जारी करता येणार नाही. राज्य निवडणूक आयोगाने या निर्देशांचे पालन न केल्यास त्याला न्यायालयाची अवमानना केली, असे समजण्यात येईल, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हंटले आहे.