शिंदेच्या नेतृत्त्वातच शिवसेनेचा दसरा मेळावा; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
राज्यात सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड गदारोळ सुरु आहे. शिवसेना नक्की कोणाची हा वाद न्यायालयात असताना आता दसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि शिवसेना एकमेकांविरुद्व उभे ठाकले आहेत. यावर्षी शिवसेना मेळावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात होणार की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात, असा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे या बद्दल मत व्यक्त केले आहे. नारायण राणे यांनी खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची असल्याचं सांगितलं आहे. तसेच यंदाचा दसरा मेळावा एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात होणार असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
उद्धव ठाकरेंमध्ये बाळासाहेबांचं काय गुण आहेत? जे घडलं ते योग्य
महाराष्ट्रात ठाकरेंचा वारस म्हणजे शिवसेनाप्रमुख होऊ शकत नाही, उद्धव ठाकरेंमध्ये बाळासाहेबांचे काही गुण आहेत का ? जे घडलं ते योग्य घडलं. मी पण बंड केलं होतं. माझ्या बंड करण्यामागे खूप कारणं आहेत. ते करावं लागतं, जे उद्धव ठाकरेंना जमलं नाही त्याला काय करणार ? खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच आहे. यंदा दसरा मेळावा हा एकनाथ शिंदेचाच होणार, उद्धव ठाकरेंना विचार द्यायला काय आहे, त्याच्याकडे कोणते विचार आहेत? ते काय बोलणार? अशी विखारी टीका नारायण राणे यांनी ठाकरेंवर केली.
एकनाथ शिंदेच्या मागे लागू नका ते एकदिवस सगळं काढतील
पुढे बोलताना राणे म्हणाले की, गेली अडीच वर्ष महाराष्ट्रावर संकंट आलं होतं. आता ते महाराष्ट्रावरचं विघ्न दूर झालं आहे,शिंदे- फडणवीस सरकार चांगलं काम करत आहेत. एकनाथ शिंदेच्या मागे लागू नका ते एकदिवस सगळं काढतील. त्यांना डिवचू नका सगळं आहे त्यांच्याकडे, असा इशारा नारायण राणे यांनी दिला.