शिंदे सरकारचा खडसेंना दणका! सुरक्षा व्यवस्था काढली

शिंदे सरकारचा खडसेंना दणका! सुरक्षा व्यवस्था काढली

सुरक्षा व्यवस्था काढल्यानंतर शिंदे सरकारवर खडसेंनी आगपाखड केली आहे. ज्यांनी 50 खोके घेतली आहेत त्यांचे पोलीस संरक्षण कधी काढणार आहेत अशी टीकाही शिंदे सरकारवर केली.

जळगाव : दूध संघाच्या गैरव्यवहारावरून एकनाथ खडसे यांनी शहर पोलीस स्टेशन बाहेर तब्बल 18 तास आंदोलन सुरू होते. यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मध्यस्थीने हे खडसेंनी आंदोलन स्थगित केले. मात्र, यानंतर पोलीस प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करणं खडसेंना भोवलं असून शिंदे सरकारने खडसेंना दणका दिला आहे. एकनाथ खडसे यांची सुरक्षा व्यवस्था काढण्यात आली आहे.

जळगाव दूध संघाच्या गैरव्यवहारावरून जळगावातील राजकीय वातावरण तापले असून दूध संघात दीड कोटींच्या चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करत एकनाथ खडसे यांनी जळगाव शहर पोलीस स्टेशन बाहेर या आंदोलन सुरू केले होते. पोलिस गुन्हा दाखल करेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा एकनाथ खडसे यांनी घेतला होता. यादरम्यान एकनाथ खडसेंची प्रकृती बिघडल्याने पोलीस स्टेशनच्या आवारातच त्यांची तपसाणी करण्यात आली. यानंतर ते एकनाथ खडसे रस्त्यावरच झोपले. एकनाथ खडसे यांना पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, पोलिसांची विनंती झुगारून गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, जयंत पाटील यांच्या भेटीनंतर व जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या बंदद्वार चर्चेनंतर एकनाथ खडसेंनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. याप्रकरणी न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती एकनाथ खडसे यांची दिली. यानंतर मात्र शिंदे सरकारने एकनाथ खडसेंची वाय प्लस सुरक्षा व्यवस्था रात्रीतून काढली

दरम्यान, सुरक्षा व्यवस्था काढल्यानंतर शिंदे सरकारवर खडसेंनी आगपाखड केली आहे. ते म्हणाले, अंडरवर्ल्डच्या संदर्भात ज्यावेळी विधानसभेत प्रश्न मांडत होतो. त्यावेळी पाकिस्तान सौदी अरेबिया, यासह इतर देशांमधून फोनवरून तुम्हाला मारून टाकू संपवून टाकू अशा धमक्या देण्यात आल्याचेही खडसे यांनी यावेळी सांगितलं. या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी केली होती तसेच स्वतः पोलिसांनी संरक्षण सुद्धा दिलं होतं.

याच प्रकरणाची आठवण करून देत खडसेंनी पोलिसांनी अचानक पोलीस संरक्षण काढून घेतलं होतं. असा मुद्दा स्पष्ट करत ज्यांनी 50 खोके ज्यांनी घेतली आहेत त्यांचे पोलीस संरक्षण कधी काढणार आहेत अशी टीकाही शिंदे सरकारवर केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com