मनोज जरांगे पाटलांना गिरीश महाजन यांचा फोन; काय झालं बोलणं?
मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपल्यानंतर मनोज जरांगे आजपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. जरांगे पाटील म्हणाले, चाळीस दिवसाचा आणि समाजाने मुख्यमंत्र्यांच्या सन्मान ठेवला आहे एक महिन्यापेक्षा अधिक दिवस सरकारला दिले होते. आता कोणालाही वेळ दिला जाणार नाही.
याच पार्श्वभूमीवर आमरण उपोषणाला बसले असताना मनोज जरांगे पाटलांना गिरीश महाजनांचा फोन आला आहे. यावेळी गिरीश महाजन यांच्याकडून मनोज जरांगे पाटलांची समजून काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. गिरीश महाजन म्हणाले की, उपोषण करु नका, आरक्षणावर मार्ग काढू. आपला जीव धोक्यात घालू नका. आम्हाला थोडा वेळ द्या. सरकारला सुद्धा आरक्षण द्यायचे आहे. वेळ दिला तर टिकणारे आरक्षण देऊ. नियमान राहून आरक्षण देणार. तुमचे 3 - 4 विषय आठवड्याभरात मार्गी लावणार. आरक्षण कोर्टात टिकलं पाहिजे ही सरकारची भूमिका. असे गिरीश महाजन म्हणाले.
यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आमचं काय चुकलं. अजून तुम्हाला किती संधी देणार. तुम्ही 15 दिवस मागितले आम्ही 41 दिवस दिले. अजून गून्हे मागे घेतले नाही आरक्षण कसं देणार. माझ्या हातून तुम्ही चांगले काम होऊ देतच नाही. तुम्ही काय मार्ग काढलाय ते सांगा. आम्ही तुम्हाला वेळ दिला तुम्ही काय केलं. असे जरांगे पाटील म्हणाले.