भाजपमध्ये अन्य पक्षातून आलेल्याना भुंकायला सांगू नये, खोत, पडळकरांना जोरदार राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर
राज्यात सध्या प्रचंड राजकीय घडामोडी तीव्र झाल्या आहेत. त्यातच सत्तांतर झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये चांगलीच जुंपलेली दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आज पुण्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यावरच आता राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या विद्या चव्हाण यांनी पलटवार केला आहे.
काय म्हणाल्या विद्या चव्हाण?
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी पवारांवर केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर देताना चव्हाण म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करणारे हे राष्ट्रवादी काँग्रेसला टोळी म्हणणारे हे बाहरचे लोकं आहेत. ती लोकं भाजपची नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करणारे हे भाजपचे नाहीत जी नेते बाहेरच्या पक्षातून आले आहेत. त्यांच्याकडूनच ही टीका केली जात आहे. असे त्या यावेळी म्हणाल्या.
पुढे त्या म्हणाल्या की, जशी सरड्याची उडी कुंपणापर्यंत तशी यांची फक्त बारामतीपर्यंत उडी जाते. त्यामुळे भाजपमध्ये अन्य पक्षातून आलेल्याना भुंकायला सांगू नये असा प्रतिहल्ला विद्या चव्हाण यावेळी केला.
काय म्हणाले होते पडळकर?
शरद पवार यांचे सध्या तीन खासदार आहेत. ते कायम राहिले म्हणजे खूप झाले. नाहीतर परत शून्यावर यायचे. त्यांनी भाजपाची काळजी करण्याची गरज नाही. त्यांनी स्वत:च्या पक्षाची लायकी, पात्रता किती आहे त्यानुसारच बोलावे. आमचे गणित ४०० चे आहे. ते अजूनही ४ पर्यंत गेलेले नाहीत. आमच्यात आणि त्यांच्यात दोन शून्यांचा फरक आहे. त्यामुळे त्यांनी तत्वज्ञान सांगण्यापेक्षा पार्टी कुठे विसर्जित करायची, यावर विचारमंथन करण्याची गरज आहे. अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली होती.