एकनाथ शिंदेंनी चोरून दहीहंडी फोडली; जयंत पाटलांचा खोचक टोला

एकनाथ शिंदेंनी चोरून दहीहंडी फोडली; जयंत पाटलांचा खोचक टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खोचक टोला लगावला आहे.

मुंबई : दीड महिन्यापूर्वी आम्ही ५० थरांची हंडी फोडली होती, या एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टोलेबाजी केली आहे. एकनाथ शिंदेंनी चोरून दहीहंडी फोडली, असा निशाणा त्यांनी मुख्यमंत्र्यांवर साधला आहे. ते पुण्यातील धायरी याठिकाणी रुपाली चाकणकर यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमाला उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील टेंभी नाका येथील दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून राजकीय टोलेबाजी करत दीड महिन्यांपूर्वी आम्हीदेखील ५० थरांची हंडी फोडली होती, असं विधान केलं आहे. त्यांच्या बोलण्याचा रोख हा शिवसेना पक्षात झालेल्या बंडखोरीकडे होता. त्यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह १२ खासदार फोडले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खोचक टोला लगावला आहे.

दीड महिन्यापूर्वी आम्ही ५० थरांची हंडी फोडली होती, या एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याबाबत विचारलं असता जयंत पाटील म्हणाले की, ही जी दहीहंडी आहे, ती बघायला किमान १५ ते २० हजार लोकं याठिकाणी जमले आहेत. सगळ्यांच्या समोर ही दहीहंडी फुटत आहे. पण एकनाथ शिंदे यांनी फोडलेली दहीहंडी ही गुप्तपणाने, चोरून कुठेतरी जाऊन फोडलेली आहे. त्याला महाराष्ट्राची अजून मान्यता नाही, त्यामुळे ती काही खरी दहीहंडी नाही, असं विधान जयंत पाटलांनी केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com