Jayant Patil : या 'कंत्राटी सरकार'चा जाहीर निषेध
मुंबई पोलीस दलात कंत्राटी पोलिसांची भरती केली जाणार आहे. एकूण 3,००० कंत्राटी पोलीस भरती केली जाणार असल्याचे निर्णय गृह खात्याकडून घेण्यात आला आहे. तसेच मुंबई पोलीस दलात कंत्राटी पद्धतीनं भरण्यात आलेल्या पदांवर घेण्यात आलेल्या पोलिसांच्या पगारासाठी 30 कोटींच्या खर्चाला सरकारकडून मंजुरीही देण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर आता जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील म्हणाले की, राज्य सरकार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरतीची कक्षा रुंदावत चालले आहे. मुंबई पोलीस दलात देखील तब्बल ३००० कंत्राटी पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला गेला. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची सुरक्षितता हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. कंत्राटी पद्धतीने रुजू झालेल्या पोलिसांची विश्वासार्हता, माहितीची गोपनीयता याबद्दल सरकारने विचार केला आहे का ही शंकाच आहे.
तसेच मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी असताना, सरकार आरक्षणाच्या नावाखाली एका समाजाला दुसऱ्या समाजाशी झुंजवत ठेवत आहे. कुशल व अकुशल नोकऱ्यांना कंत्राटी पद्धतीने भरून सुशिक्षित तरुणांचे शोषण करण्याचा हा प्रकार आहे. काही मोजक्या खाजगी कंपन्यांना कंत्राट दिले जात आहेत. नक्की कोणाच्या फायद्यासाठी सरकार हा निर्णय रेटून नेत आहे? खाजगीकरणाच्या मानसिकतेला खतपाणी घालणाऱ्या या 'कंत्राटी सरकार' चा जाहीर निषेध. असे जयंत पाटील म्हणाले.