Nawab Malik : नवाब मलिक आजही सत्ताधारी बाकावरच बसले

Nawab Malik : नवाब मलिक आजही सत्ताधारी बाकावरच बसले

काल बसले होते तिथेच नवाब मलिक बसले 
Published by :
Siddhi Naringrekar

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी बाकावर बसले. यावरून मलिकांनी अजित पवार गटाला पाठिंबा असल्याचं स्पष्ट झालं आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. यावरुन देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना खुले पत्र लिहीले आहे. सत्ता येते जाते, सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा, असे म्हणत नवाब मलिकांना महायुतीत घेण्यास फडणवीसांनी विरोध केला आहे. 

यातच आज पुन्हा एकदा नवाब मलिक हे सत्ताधारी बाकावर बसले आहेत. आमदार चेतन तुपे यांच्या शेजारी नवाब मलिक बसले आहेत.

काय आहे देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रात?

माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रुता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो. परंतु, ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे, असे फडणवीसांनी म्हंटले आहे.

सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, हे मान्यच आहे. परंतु, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो. त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे.

त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल, अशी मला आशा आहे, असे फडणवीसांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com