Manoj Jarange Patil : गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड; मनोज जरांगे पाटील म्हणाले...
गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वी काही मराठा आरक्षण संघटनांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या परळ येथील घराबाहेर उपोषण केलं होतं. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास तीन अज्ञात व्यक्तींनी वकील गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्यांना ताब्यात घेतलं आहे.
सदावर्ते म्हणाले की, मनोज जरांगेंना तातडीने अटक करा. जरांगेंचे लाड थांबवले नाहीतर मी पण उपोषण करणार. हल्ला झाला तरी मी माझा लढा सुरुच ठेवणार. सरकारने एकट्या मनोज जरांगेंचं ऐकू नये. हेच जरांगे पाटलांच्या शांततेचे आंदोलन आहे का? माझी मुलगी झेनला मारण्याच्या आणि जयश्री पाटलांना उचलून नेण्याच्या धमक्या दिल्या जातायत. जरंगे पाटील यांना माझा प्रश्न आहे हीच आहे का तुमच्या शांततेच्या आंदोलनाची भाषा. असा सवाल सदावर्ते यांनी विचारला.
यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, कुणी हल्ला केला माहीत नाही. पण तो कोणत्याही समाजाचा असो. मराठ्यात माणुसकी जिवंत आहे.वाहनांची तोडफोड झाली, त्याचं समर्थन करत नाही. मराठा समाज शांततेतच आहे. मराठा समाज शांततेत आहे, शांततेत राहील. तो वेगळं आंदोलन करणार नाही. आमचं आंदोलन चालूच राहणार आहे. हल्ल्याबाबत मला काहीच माहीत नाही. हा हल्ला कुणी केला माहीत नाही. आमचे आंदोलक असं काही करणार नाही, असं सांगतानाच अशा प्रकारच्या हल्ल्याचं आम्ही समर्थन करत नाही. असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.