आरोपानंतर गायरान घोटाळ्यावर मंत्री सत्तारांचे उत्तर; म्हणाले, जी शिक्षा देईल ती मला मान्य...
राज्यात सध्या प्रचंड राजकीय घडामोडी घडत आहे. त्यातच नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन पार पडत आहे.अनेक विषयावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जुंपलेली दिसत आहे. शिंदे-भाजप सरकारमधील कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गायरान जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. यावरुन अधिवेशनात विरोधकांनी सत्तार यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली होती. त्यामुळे कालपासून मंत्री अब्दुल सत्तार या आरोपांवर काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यावरच आज मंत्री अब्दुल सत्तार यांनी यावर उत्तर दिले आहे.
आठव्या दिवशी अधिवेशनात बोलताना मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, योगेश खंडारे नामक व्यक्तीला वाशिम जिल्ह्यातील ३७ एकर जमीन नियमित करून दिल्याचा हा आरोप आहे. विधानसभेत बोलताना, शासन निर्णयानुसार, काही जमिनी भूमीहीन शेतकरी, अनुसूचित जाती जमाती या व्यक्तींना प्रदान करणे अनुज्ञेय आहे. शासनाच्या निर्णयानुसार अशा व्यक्तींची अतिक्रमणं नियमित करण्याचे निर्णय यापूर्वी अनेकवेळा घेण्यात आले आहेत.
त्यात शाळा, दवाखाने, सार्वजनिक बांधकामे यासाठी हे नियम शिथिल करण्यात येतात. या प्रकरणातील मागासवर्यीय, आदिवासी समाजाचे प्रमुख लोक होते, त्यांच्यासाठी हा निर्णय घेतला आहे. मला जे आरोप केलेत, त्यानुसार हायकोर्टाने मला जी शिक्षा देईल, ती मान्य आहे. या समोरच्या बाकावर बसलेल्या लोकांनी एवढ्या जमिनी ढापल्या आहेत की, त्याचा काही अंदाजा नाही. मला ईश्वर, अल्लाह, भगवान आणि जे अधिकार दिलेत त्याचा वापर करत मी सामन्य लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.
या आदेशामुळे कोणताही फायदा किंवा नुकसान झालेलं नाही. महसूल मंत्री यांच्यासमोर पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. यावर कोर्ट जो निर्णय देईल, तो मान्य असल्याचं वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केलं. पण हे लोक जे आरोप करू लागले. या आरोपात काही तथ्य नाही. काही खर नाही. परंतु, एखाद्याला न्याय देताना मला कोर्ट जी शिक्षा देईल ती मला मान्य आहे.