बेबंदाना बंध घाला, सामान्यांना 'बंद' नको; डोंबिवली बंदवर मनसेची नाराजी
राज्यात सध्या प्रचंड राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. त्यातच आज मविआचा राज्यसरकार विरोधात आज महामोर्चा होता. मात्र, दुसरीकडे (शिवसेना) ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्रातील संतांविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना, वारकरी संप्रदाय, बजरंग दल, भाजप यांच्यावतीने शनिवारी डोंबिवली बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, या बंदला डोंबिवलीकरांनी अल्प प्रतिसाद दिल्याचे चित्र पहायला मिळाले आहे. त्यावरच आता मनसेने या बंदवर नाराजी व्यक्त केली आहे.
अंधारे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना, वारकरी संप्रदाय, बजरंग दल, भाजप यांच्यावतीने शनिवारी डोंबिवली बंदची हाक देण्यात आली होती. यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून या बंदवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते ट्विटमध्ये म्हणाले की, बंद. काय संबंध? छत्रपती शिवराय, महाराष्ट्रातील संत ह्यांच्याबद्दल बोलताना संयम आणि जीभ ढळताच कामा नये. निश्चितच निषेधार्ह.पण कुणीतरी काहीतरी बरळतं ह्याचा भुर्दंड सामान्यांना का? थेट 'कारवाई' करा ना. बेबंदाना बंध घाला, सामान्यांना 'बंद' नको. अशा शब्दात त्यांनी शिंदे गटावर आणि भाजपवर निशाणा साधला आहे.