Uddhav Thackeray
Uddhav ThackerayTeam Lokshahi

नागपुरमधील वज्रमुठ सभेत उध्दव ठाकरे पुन्हा भाजप आणि शिंदे गटावर बरसले; वाचा भाषणातील प्रमुख मुद्दे

दारुचं व्यसन घर उद्ध्वस्त करतं पण सत्तेची नशा देश उद्ध्वस्त करते.

राज्यात राजकीय गदारोळा दरम्यान आज महाविकास आघाडीची दुसरी वज्रमुठ सभा पार पडली. महाविकास आघाडीतील अनेक मोठ्या नेत्यांनी भाषणातून भाजप आणि शिंदे गटावर नेहमीप्रमाणे टीका केली. त्यातच यासभेत बोलताना पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी शिंदे गटासह भाजपवर निशाणा साधला. मुख्यमंत्री शिंदेपासून ते केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत उध्दव ठाकरेंनी चौफेर टीका केली.

वाचा आजच्या उध्दव ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे.

कर्जमुक्त करुन दाखवलं

1.महाविकास आघाडीची आजची दुसरी सभा आहे, त्यानंतर आज महाराष्ट्राच्या उपराजधानी नागपूरमध्ये होत आहे. मला जुने दिवस आठवले. तेव्हा एकत्र नव्हतो. राष्ट्रवादी आणि काँग्रेस, शिवसेना समारोसमोर होते. आम्ही त्यावेळी कर्जमुक्त करुन दाखवलं होतं. असे उध्दव ठाकरे म्हणाले.

दारुचं व्यसन घर उद्ध्वस्त करतं पण सत्तेची नशा देश

2.अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं, ही आनंदाची गोष्ट आहे. पण हा पुरस्कार कुणाच्या हस्ती देण्यात आला? सच्च्या समाजसेवकासमोर झुकावं लागतं. आप्पासाहेब यांचं घराणं मोठं आहे. या घराण्याची मोठी परंपरा आहे. त्यांचं घराणं व्यसनमुक्तीचं काम करतात. दारुचं व्यसन घर उद्ध्वस्त करतं पण सत्तेची नशा देश उद्ध्वस्त करते. अशी अप्रत्यक्ष टीका उध्दव ठाकरेंनी अमित शहा यांच्यावर केली.

बाबासाहेबांनी देशाला संविधान दिलं हा डेकोरेशनचा भाग नाही

3.एवढी लोकं जमली आहेत. पण आपल्या देशात आज लोकशाहीचा उपयोग फक्त सत्तेत बसलेल्यांच्या मित्रांचा गिऱ्हाईक आणि सत्ताधाऱ्यांच्या मतदार वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातोय. जगाच्या श्रीमंतीत अव्वल, यांच्या मित्रांचे क्रमांक वाढत चालला आहे, पण गोरगरीब जनतेचा क्रमांक खाली चालला आहे. ही तूच भूमी आहे ज्या भूमीत बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवलं. बाबासाहेबांनी देशाला संविधान दिलं आहे. हा डेकोरेशनचा भाग नाही. भारत मातेच्या पायात पुन्हा बेड्या घालण्याचं काम सुरु आहे. एका माणसाने देशाला घटना दिला. मग एवढी मोठी जनता संविधान वाचवू शकत नाही. मी घटना बचाव करणार असं म्हणार नाही तर घटनेचं संरक्षण मीच करणार असं म्हणेन. असे देखील विश्वास ठाकरेंनी यावेळी व्यक्त केला.

उलट्या पायांचं सरकार आल्यानंतर अवकाळी पाऊस येतोय

4.मी हल्ली शब्द जपून वापरायला लागलो आहे. आठ-दहा दिवसांपूर्वी फडतूस शब्द बाहेर आला होता. पण फडतूस बोलण्यामागील माझा उद्देश काय होता? मविआच्या सरकारवेळी जागतिक संकट होतं, पण हे उलट्या पायांचं सरकार आल्यानंतर अवकाळी पाऊस येतोय. अशी देखील टीका त्यांनी राज्य सरकारवर केली.

आम्ही वार झेलू तर छातीवर झेलू आणि करु तर छातीवर करु

5.आजच्या सभेचं वेगळेपण सांगतो. पहिले युती होते, पण आम्हाला फसवलं, त्यानंतर आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आलो. आमच्या सरकारने काम केलं मग जनतेसमोर आलोय. सरकार गद्दारी करुन पाडलं. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आम्ही वार झेलू तर छातीवर झेलू आणि करु तर छातीवर करु. हे अवकाळी सरकार आलं आहे. अशी देखील विखारी टीका त्यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर केली.

पहिले मंदिर मग सरकार असं आम्ही म्हणालो होतो

6.अयोध्येला मी, संजय राऊत सुद्धा गेलो होतो. मी पहिल्यांदा गेलो तेव्हा तो मुद्दा कोर्टात प्रलंबित होता. पहिले मंदिर मग सरकार असं आम्ही म्हणालो होतो. तेव्हा पंतप्रधान मोदींना आधीच बोललो होतो की, तुमचं सरकार आहे, आपण राम मंदिर बनवूया. पण ते सुप्रीम कोर्टात काय व्हायचं ते होऊ द्या म्हणाले. मग आता श्रेय का घेताय? असा निशाणा त्यांनी भाजपवर साधला.

तुझा शर्ट माझ्यापेक्षा जास्त भगवा कसा?

7.मुख्यमंत्री खरे रामभक्त असते तर आधी सुरत आणि गुवाहाटीला नाही तर अयोध्येला गेले होते. आताचे उपमुख्यमंत्री अयोध्येला गेले नव्हते. पण हे जातील म्हणून तुझा शर्ट माझ्यापेक्षा जास्त भगवा कसा? म्हणत ते सुद्धा गेले. अशी जोरदार टीका त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर केली.

पंचनामे कशाला करताय तर आमच्या मैताला या हे निर्लज्ज आहेत, मैतालासुद्धा जातील

8.रामराज्य महाराष्ट्रात कधी येणार? शेतकरी एवढा टाहो फोडत आहेत, आक्रोश करत आहेत, सरकार पंचनामे करायलाही जात नाही. मग मुख्यमंत्री जातात आणि आदेश देतात की, ताबडतोब पंचनामा करा. जेव्हा आपलं सरकार होतं तेव्हा शेतकऱ्यांच्या हातात वेळेत मदत पोहोचत होती की नाही? आता शेतकरी बोलत आहेत की, पंचनामे कशाला करताय तर आमच्या मैताला या. हे निर्लज्ज आहेत, मैतालासुद्धा जातील. अशी बोचरी टीका सरकारवर केली.

शिवसेना प्रमुखांनी त्यावेळी फोनवर सांगितलं होतं की...

9.पंतप्रधान मोदींनीसुद्धा आठ वर्षात काय केलं ते जनतेसमोर येऊन सांगत का नाही? ज्या पद्धतीने शिवसेनेचं नाव चोरलं, माझा बाप चोरलं, मग तुम्ही जनतेला कसं सांभाळणार? चंद्रकांत पाटील बोलले की, बाबरीच्या वेळेला बाळासाहेब नव्हते, मग तुमचे काका गेले होते का? बाबरी पाडल्यानंतर भाजपच्या गोटात पळापळ झाली होती. शिवसेना प्रमुखांनी त्यावेळी फोनवर सांगितलं होतं की, जर बाबरी माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे. मी आव्हान देतो मी माझ्या वडिलांचं नाव घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून येतो. तुम्ही तुमच्या वडिलांचं नाव घेऊन या. मैदानात या, एका व्यासपीठावर बोला. तुम्हाला जे बोलायचं ते बोला, आम्ही जे बोलायचंय ते बोलू. जनता जनार्दन आहे. असे आव्हान त्यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांना दिले.

हो संभाजीनगरच्या सभेला मुसलमान आले होते. ते माणसं नाहीत?

10.मी काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदूत्व सोडलं बोलतात. पण मला संघाला विचारायचं आहे की, नेमकं तुमचं चाललंय काय? आमचं शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही. यांचं हिंदुत्व गोमुत्रधारी हिंदुत्व आहे. गोमुत्र शिंपडता त्यापेक्षा थोडं प्राशन करा, अक्कल येईल. इकडे आलेली माणसं माणसं नाहीत का? हो संभाजीनगरच्या सभेला मुसलमान आले होते. ते माणसं नाहीत? भाजपने जाहीर करावं त्यांचं हिंदुत्व काय?ते शिवसेनाप्रमुखांचं हिंदुत्व नाकारत आहेत. मोहन भागवत मशिदीत जाऊन आले. एकाबाजूला हनुमान चालीसा म्हणायची आणि मशिदीत दाऊन कव्वाली ऐकणार. हे यांचं हिंदुत्व आहे.आम्ही काँग्रेसबरोबर गेलो. आम्हाल कोणी घालावलं? प्राण न जाये, पण वचन न जाए, असं काही नाही. खुर्ची मिळाली भरपूर झालं. असे उध्दव ठाकरे म्हणाले.

देश म्हणजे दगड, धोंडे नाहीत

11.देश कसा असला पाहिजे? मोकळा असला पाहिजे. देश म्हणजे दगड, धोंडे नाहीत. देश म्हणजे या देशाचे माणसे. क्रांतीकारकांनी आपल्यासाठी जीव दिला असेल तर निवडणुकीत कोण पर्याय असावा? क्रांतीकारकांनी गोळ्या झेलल्या, त्यांनी फास घेतले, पण तुम्हाला फक्त बोटांनी निर्णय द्यायचा आहे. तेवढं तुम्ही करु शकता. हे नाहीतर कोण असा पर्याय उभा केला जातो. नाही तर कोण काय कुणीही येईल.राहुल गांधी यांना अपात्र ठरवलं, केजरीवालांना आता आत टाकतील. सत्यपाल मलिक यांनी मोठा स्फोट केलाय. हिडनबर्ग संस्था तर बाहेरची आहे. पण सत्यपाल मलिक हे त्यांचे पक्षाचे आहेत. तुम्ही त्यांना राज्यपाल म्हणून बसवलं होतं. अशा व्यक्तीने विधान केलंय ते गंभीर आहे. ते पुलवामाच्या हल्ल्याबद्दल बोलले आहेत. या हल्ल्याचं ते राजकीय भांडवल करण्याची शक्यता आहे. असे भाष्य त्यांनी पुलवामा हल्लाबद्द्ल केले.

संपूर्ण देश आणि राज्य नासून टाकलं आहे

12.सगळं आलबेल आहे, असा भ्रम निर्माण केला जातोय. मोदींचं सरकार येण्याआधी डॉलर, गॅस सिलेंडरचा भाव काय होता? कुणाच्या लक्षात आहे? या सरकारने आनंदाचा शिधा सुरु केलाय. पण त्यातून मिळालेल्या धान्याला बुरशी लागलेली आहे. संपूर्ण देश आणि राज्य नासून टाकलं आहे. आम्ही तुमच्यासाठी लढतोय. आता जिंकेपर्यंत थांबायचं नाही. तुमच्यात वज्रमूठ आवळायची हिंमत होतेय ना? असे ते म्हणाले.

एक सुद्धा भाडखाऊ यामध्ये नाही

13.आता एक-एक मुद्दे समोर येत आहेत. महागाई, बेकारी याचे चटके लागू नये यासाठी धार्मिक भ्रम निर्माण केला जातोय. या बुर्ख्यामागचा बेसूर चेहरा पाहा. जे चाललंय ते तुम्हाला मान्य आहे का? आम्ही करतोय ते तुम्हाला मान्य आहे की नाही? एक सुद्धा भाडखाऊ यामध्ये नाही, एकसुद्धा माणूस भाड्याने आणलेला नाही. आता जिंकल्याशिवाय थांबायचं नाही. असा विश्वास व्यक्त करत त्यांनी भाषण थांबवले.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com