दोन 'भ' भाजपने पाळले आहेत; पटोलेंचा निशाणा
रत्नागिरी : अजित पवार यांनी भाजप सोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर शरसंधान सोडले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पटोलेंनी भडजीची उपमा देत निशाणा साधला आहे.
एकीकडे प्रेत जळत होती आणि राजभवनामध्ये जयघोष सुरू होता. महाराष्ट्रातील कालचा काळा दिवस असून यांना पाप करायचं होतं तर दोन चार दिवस मागेपुढे करून चालले असते. जनतेच्या डोळ्यात अश्रू असताना राजभवनामध्ये जयघोष होता.
दोन भ भाजपने पाळले आहेत, भय आणि भ्रष्टाचार या दोन गोष्टी भाजपने इंग्रजांसारख्या आत्मसात केल्यात. भ्रष्टाचाराच्या नवीन आयामाला ऑपरेशन लोटस असं नाव दिलं जातं. याचे परिणाम भाजपला भोगावे लागतील. भय आणि भ्रष्टाचार या दोघांना घेऊन भडजी लोकांनी हे काम केलं आहे. भडजींचे राजकारण काय असतं हे जनतेला कळल आहे, असे म्हणत नाना पटोलेंनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
तर, विरोधी पक्षनेते पदाबाबत बोलताना पटोले म्हणाले की, तिन्ही पक्ष एकत्र येऊन विरोधी पक्ष संदर्भात निर्णय होईल. शरद पवार यांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये ज्या पक्षाचे जास्त आमदार असतात त्याचाच विरोधी पक्ष नेता होतो, असे स्पष्ट केला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी पासून यासंदर्भातील निर्णय घेऊ. काँग्रेसच्या विधिमंडळ सदस्यांची उद्या बैठक असून यात विरोधी पक्षनेते संदर्भातला निर्णय उद्या होईल, असे त्यांनी सांगितले.