धर्मांध व जातीवादी भाजपाला पराभूत करणे हेच काँग्रेस पक्षाचे लक्ष्य : नाना पटोले

धर्मांध व जातीवादी भाजपाला पराभूत करणे हेच काँग्रेस पक्षाचे लक्ष्य : नाना पटोले

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने महत्वाची बैठक बोलावली आहे.

मुंबई : धर्मांध व जातीवादी भारतीय जनता पक्षाचा पराभव करणे हेच काँग्रेसचे लक्ष्य असून आगामी लोकसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढण्याचा पक्षाचा निर्धार आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने महत्वाची बैठक बोलावली आहे. टिळक भवन या पक्ष कार्यालयात २ व ३ जून रोजी लोकसभा मतदारसंघ निहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला राज्यातील सर्व प्रमुख नेते व जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत प्रत्येक मतदारसंघाचा सर्वबाजूने विचार केला जाणार आहे.

भारतीय जनता पक्षाचे सरकार मागील ९ वर्षांपासून देशाला अधोगतीकडे घेऊन जात आहे. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षाच्या सरकारने भारताला जगात एक महाशक्ती म्हणून उभे केले पण नरेंद्र मोदी सरकारने केवळ ९ वर्षांत देशातील सर्व वैभव विकण्याचा सपाटा लावला आहे. देश विकून देश चालवला जात आहे.

जाती-धर्मांमध्ये विष कालवून राजकीय पोळी भाजण्याचे पाप केले जात आहे. नुकत्याच झालेल्या हिमाचल प्रदेश व कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जनतेने भरघोस मतदान करत विजयी केले आहे. या विजयाने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण झाली असून महाराष्ट्रातही भारतीय जनता पक्षाला धूळ चारू, असा निर्धार नाना पटोलेंनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com