...पण राहुल गांधींविषयी मीडियाने अपप्रचार केला : पृथ्वीराज चव्हाण
मुंबई : काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या निवडणूक आज पार पडत आहेत. यावर कॉंग्रेसमधील नेत्यांची प्रतिक्रिया आता समोर येत आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधींविषयी मीडियाने अपप्रचार केला असल्याची खंत कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणूक नंतर राजीनामा दिला आणि हंगामी अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांची निवड केली. आम्ही एक गोपनीय पत्र लिहिलं की काँग्रेसचा सतत पराभव होत होता. त्यासाठी आत्मचिंतनाची गरज आहे. काँग्रेसला पूर्ण वेळ अध्यक्ष मिळावा ही एक मागणी होती. डिसेंबरमध्ये बैठक झाली. पण, त्या मागण्या अंमलात आणल्या गेल्या नाही. सोनिया गांधी यांनी आमच्या मागण्या मान्य केली. राहुल गांधी यांचा विरोध नव्हता. परंतु, मीडियाने अपप्रचार केला, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
अंधेरी पोटनिवडणूक भाजपने लढवू नये, असे पत्र राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना लिहीले होते. यावर भाजपने निर्णय घ्यावा. बिनविरोध झाले तर बरंच आहे, अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. तर, एमसीएसंदर्भात बोलताना ते म्हणाले, खेळ आणि राजकारण वेगळं आहे, क्रिकेट मध्ये खेळ आणू नये, असे त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, देशभरातील 40 केंद्रांवर कॉंग्रेसने मतदानासाठी 68 बूथ स्थापन केले आहेत. सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवन येथे निवडणूक मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकीत सोनिया गांधी, प्रियंका गांधी या दिल्लीत मतदान करतील तर राहुल गांधी हे बेल्लारीमध्ये मतदान करणार आहेत.
निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसचे राज्यसभा खासदार मल्लिकार्जुन खरगे विरुद्ध काँग्रेस लोकसभेचे खासदार शशी थरूर सामना रंगणार आहे. या निवडणुकीचा निकाल बुधवारी येणार आहे. काँग्रेस अध्यक्ष पदा कोण विराजमान होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.