Raj Thackeray : मी कुणाच्याही महत्त्वाकांक्षा पुऱ्या करण्यासाठी पक्ष काढलेला नाही!
अंबरनाथ : मयुरेश जाधव : मी कुणाच्याही महत्त्वाकांक्षा पुऱ्या करण्यासाठी पक्ष काढलेला नसून गटबाजी करणारे यापुढे पदावर राहणार नाहीत, असा थेट इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे. अंबरनाथमध्ये घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात राज ठाकरे यांनी गटबाजी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना हा इशारा दिला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या ठाणे जिल्ह्याच्या दौरावर असून आज त्यांनी अंबरनाथमध्ये पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. अंबरनाथच्या रोटरी क्लबमध्ये हा संवाद आयोजित करण्यात आला होता. यानंतर पत्रकारांशीही राज ठाकरे यांनी संवाद साधला. यावेळी अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर शहरांमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये असलेल्या गटबाजीबाबत राज ठाकरे यांना विचारलं असता, मी कुणाच्याही महत्त्वाकांक्षा पुऱ्या करण्यासाठी पक्ष काढलेला नाही. ज्यांना स्वतःच्या अहंपणांमध्ये जगायचं असेल, ते यापुढे पदावर राहणार नाहीत. यापुढे गटबाजी होणार नाही. यासाठीच मी दौऱ्यावर आलो आहे, अशा कडक शब्दात राज ठाकरे यांनी गटबाजी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना इशारा दिला. त्यामुळे आता तरी मनसे पक्षातले गट-तट संपून सर्व पदाधिकारी एकत्र येतात का? हे पाहावं लागेल. तरच आगामी नगरपालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये मनसेचा निभाव लागू शकेल.