Raj Thackeray : राजकीय नेत्यांकडून तुमचा वापर केला जातोय; त्यांना फक्त मतं हवी
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेमुळे राज्यभरातील वातावरण देखील चांगलेच तापले आहे. यावरूनच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. याच पार्श्वभूमीवर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलकांची भेट घेतली.
यावेळी राज ठाकरे म्हणाले की, मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेन. राजकीय नेते फक्त तुमचा वापर करत आहेत. आरक्षणाचा मुद्द्यावर मतं मिळवली. पोलिसांनी दोष देऊ नका, पोलिसांना आदेश कोणी दिले त्यांना धडा शिकवा. ज्यांनी गोळ्या झाडल्यात त्यांना मराठवाड्यात यायला देऊ नका. मला या नेत्यांसारखं खोट बोलता येत नाही. तुमच्यापर्यंत गोष्टी चुकीच्या पोहचवण्यात आल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधेन. आरक्षणाच्या मुद्यावर त्यांच्याशी बोलून हा प्रश्न सोडवायचा पूर्ण प्रयत्न करेन.
फडणवीस म्हणतात राजकारण करू नका, पण फडणवीस विरोधात असते तर त्यांनी काय केले असते? मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, हे मी आधीच सांगितले होते.जालना येथील घटनेत पोलिसांना दोष देऊ नका, कारण त्यांना आदेश देणारे दोषी आहेत. असे राज ठाकरे म्हणाले.