दसरा मेळाव्याला राज ठाकरेंनी शिवतीर्थावर संबोधित करावे; मनसे सैनिकाची मागणी

दसरा मेळाव्याला राज ठाकरेंनी शिवतीर्थावर संबोधित करावे; मनसे सैनिकाची मागणी

शिवसेना आणि शिंदे सरकारवर सोडले टीकास्त्र

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तानाट्यानंतर शिंदे गटाकडून शिवसेनेचा 'दसरा मेळावा' हायजॅक करणार असल्याची माहिती समजत आहे. त्यानुसार हालचालीही शिंदे गटाकडून सुरु झाल्या आहेत. यावरुन शिवसेना व शिंदे गटात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. अशात संदीप देशपांडे यांनी महाराष्ट्र सैनिक म्हणून एक पत्र ट्विट केले आहे. यात शिवसेना आणि शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडत दसरा मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर संबोधित करावे, अशी मागणीही मनसेने केले आहे.

काय आहे पत्र?

वंदनीय हिंदुहृदसम्राट कै. बाळासाहेब ठाकरे आणि शिवतीर्थावरील दसरा मेळावा हे आपल्या महाराष्ट्रातील केवळ राजकीयच नव्हे तर सांस्कृतिक समीकरणही होते. सलग चार दशकांहून अधिक काळ 'एक वक्ता, एक मैदान आणि लक्ष लक्ष श्रोते' हा चमत्कार अवघ्या जगात कुठे पहायला मिळाला असेल तर तो इथेच, आपल्या शिवतीर्थावर!

दसऱ्याच्या दिवशी मराठी जनांच्या रांगाच्या रांगा ढोल-ताशे वाजवत, गुलाल उधळत शिवतीर्थावर येत आणि हिंदुहृदसम्राटांकडून मिळालेलं राष्ट्रभक्ती आणि महाराष्ट्र धर्माचं 'बाळकडू'- विचारांचं सोनं घेऊन घरी परतत. दुर्दैवाने, वडिलोपार्जित वास्तूत राहतो इतक्याच पुण्याईवर स्वत:ला हिंदुहदसम्राटांचे राजकीय वारसदार म्हणवणाऱ्यांनी कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या आणि आक्रमक मराठी अस्मितेच्या धगधगत्या विचार कुंडालाच तिलांजली दिली. ज्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी राजकीय पक्षांवर प्रबोधनकार आणि हिंदुहदयसम्राटांनी संपूर्ण हयातभर लेखणी, कुंचला आणि वाणीने आसूड ओढले, त्याच राष्ट्रद्रोही-धर्मद्रोही पक्षांशी आघाडी करून हिंदुत्वाच्या विचारांवर मतदान करणाऱ्या लक्षावधी शिवसैनिकांचा आणि मतदारांचा विश्वासघात केला. त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला! बरं, इतकं सगळं करूनही स्वत:चा राजकीय पक्ष आणि सरकार या वारसदारांना सांभाळता आलं नाहीच, असा निशाणाही मनसेनी शिंदे सरकार व शिवसेनेवर साधला आहे.

एरवी या सर्व गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केलं असतं. पण आता "कै. बाळासाहेब ठाकरे यांचे आम्हीच खरे वारसदार" असं म्हणत 'यू टर्न' आणि 'बंडखोर' असे दोन्ही गट शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची भाषा करत आहेत. लक्ष लक्ष मराठीजनांसमोर हिंदुत्वाचं अग्निकुंड धगधगतं ठेवण्यासाठी ज्वलंत भाषण करण्याची क्षमता मात्र त्यांपैकी कुणातच नाही! ज्या दसरा मेळाव्यामुळे राज्यातील मराठी भूमिपुत्रविरोधी आणि देशभरातील हिंदूविरोधी राजकीय पक्षांना धडकी भरायची, तोच दसरा मेळावा आज राजकीय चेष्टा-मस्करीचा विषय ठरत आहे, याहून मोठी शोकांतिका ती कोणती, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

वंदनीय कै. बाळासाहेब ठाकरे आणि शि व से ना या चार अक्षरांवर प्रेम करणारा, त्यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगणारा प्रत्येक मराठी आणि हिंदू व्यथित झाला आहे, गोंधळला आहे. त्याच्या मनातला हा गोंधळ दूर करणं अत्यंत गरजेचं आहे. हिंदूंची मरगळलेली मनं पुन्हा एकदा चेतवण्याचे, मराठी जनांचा मानसिक गोंधळ दूर करण्याचे कार्य सिद्धीस नेण्याची क्षमता असलेली एकमेव व्यक्ती या महाराष्ट्रात आहे. ती म्हणजे आपण - हिंदूजननायक श्रीमान राजसाहेब ठाकरे!

म्हणूनच कोट्यवधी हिंदू तसंच मराठी जनांच्या वतीने आमच्यासारख्या लक्षावधी हिंदवी रक्षकांची, महाराष्ट्र सेवकांची आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे की, दसऱ्याला आपण वंदनीय हिंदुहृदसम्राट कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर कडवी निष्ठा असणाऱ्या प्रत्येक हिंदूला, प्रत्येक मराठी माणसाला मार्गदर्शन करावे. दसऱ्यानिमित्त शिवतीर्थावर आपल्या परखड, रोखठोक 'ठाकरी' शैलीतील वक्तृत्वाच्या तेज:पुंज आविष्काराची - “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो..." या हाकेची महाराष्ट्र आणि अवघा हिंदुस्थान आतुरतेने वाट पहात आहेत, असे आवाहन त्यांनी राज ठाकरे यांनी केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com